Advertisements

Advertisements

गुडधेंनी इशा-यात केलेला टक्केवारीचा आरोप तद्दन खोटा
४८ तासात माफी न मागितल्यास करणार गुन्हा दाखल
नागपूर,ता.४ ऑगस्ट २०२६: काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफूल्ल गुडधे पाटील यांनी त्यांच्या फेसबुकवर व्हायरल केेलेल्या व्हिडीयोमध्ये मतदार यादीचे विशेष सखोल पुनर्निरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात मुस्लिमांची नावे गहाळ होणार असून ,फॉर्म क्र.६ व ७ चा उल्लेख त्यांनी केला.यासाठी भारतीय जनता पक्षाला त्यांनी लक्ष्य केले.ते फॉर्म आम्हाला दाखवा नाही तर कायमचे राजकारण सोडा असे आव्हान भाजपचे शहराध्यक्ष व माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
तीन दिवसांपूर्वीच मी पत्रकार परिषद घेतली होती कारण गुडधे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप करीत होते,त्याला उत्तर देणे क्रमप्राप्त होते,असे दयाशंकर तिवारी म्हणाले.काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल गुडधे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी विविध आरोप केले होते. त्या आरोपांबाबत मी पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. त्यावेळी मी हे सर्व आरोप निराधार असल्याचे सांगितले होते.यानंतर प्रफुल गुडधे यांनी माझ्या वक्तव्याला उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी काय भूमिका मांडली, यावर मला भाष्य करायचे नाही. मात्र, त्यांच्या काही सार्वजनिक वक्तव्यांमधून त्यांच्या विचारसरणीबाबत आणि वक्तव्यांबाबत प्रश्न उपस्थित होतात.
काल एका माध्यमात दिलेल्या मुलाखतीत देखील गुडधे यांनी एसआयआर संदर्भात जिल्हाधिकारी यांना पत्र दिल्याचे सांगितले.या पत्राचे उत्तर जिल्हाधिकारी यांनी द्यायला हवे होतेे,गुडधेच प्रश्न निर्माण करीत आहेत व तेच उत्तर ही देत असल्याचा टोला तिवारी यांनी याप्रसंगी हाणला.
भाजप नागपूरात राबविल्या जात असलेल्या एसआयआर प्रक्रियेत दलित,ओबीसी विशेषत: मुस्लिमांची मते गायब करीत असल्याचा आरोप गुडधे यांनी केला मात्र,काँग्रेसच्या या शहराध्यक्षाचे डोके ठिकाणावर नसल्याची टिका तिवारी यांनी केली.दहा मिनिटांच्या मुलाखतीत ३० वेळा गुडधेंनी मला ‘विक्षिप्त’ असल्याचे संबोधले.नागपूरात पोलिस आयुक्त पदावर नियुक्त होताच,हे पोलिस आयुक्त मला नक्षलवादी ठरवून माझा एनकाऊंटर करणार असल्याची वल्गना देखील गुडधे यांनी केली होती.त्यांची ही विधाने ऐकून,तरी देखील गुडधे मलाच विक्षिप्त असल्याचे सांगतात,असा टोला त्यांनी हाणला.
मला कोणावरही खासगी टिका करायला आवडत नाही मात्र,ज्या मुस्लिमांचे नाव एसआयआर प्रक्रियेत कमी होणार असल्याचा दावा गुडधे करीत आहेत त्यांची नावे भिवंडीच्या मतदारसंघात आढळले आहेत.काँग्रेसला मुस्लिमांचे लांगूनचालन ‘विरासत’मध्ये मिळाली असल्याची जहाल टिका तिवारी यांनी केली.
आजच काँग्रेसच्याच एका आमदाराचा एक व्हिडीयो व्हायरल झाला.यामध्ये ते एसआयआर प्रक्रियेत कम्यूनिस्ट पक्षाचे बोगस मतदार गहाळ झाल्यानेच केरळमध्ये काँग्रेस विजयी झाली असल्याचा दावा हे आमदार करीत आहेत,यावर गुडधे काही बोलतील का?असा सवाल त्यांनी केला.
नागपूरातील इतवारीतील सराफा ओळीत हजारो बंगाली कारागिर आहेत.दर वर्षी माँ काली उत्सवासाठी ते रेल्वे,बसने प.बंगालमध्ये जातात त्यावेळी त्यांची वाहतूक साधने खचाखच भरली असतात.बंगालमधील मतदानासाठी देखील ते गेले.मात्र,एसआयआर नियमाप्रमाणे देशातील कोणताही मतदार दोन ठिकाणी मतदान करु शकत नाही.
सुरेंद्र नगर मध्ये देखील असेही हिंदू मतदार आढळले, ज्यांची जमीन जायदाद ही मूळ गावी असून तेथील मतदारयादीत त्यांची नावे आहेत.कुटूंब प्रमुख म्हणून त्या जमीन जायदादची मालकी कायम राहण्यासाठी हे मतदार मूळ गावातील मतदार यादीत स्वत:चे नाव कायम ठेवतात व नागपूरात कुटूंबियांची नावे मतदार यादीत ठेवतात.दोन्ही ठिकाणी शासनाच्या योजनांचा लाभ घेतात.मात्र.गुडधे भाजपवरच आरोप करीत आहेत की आम्ही एसआयआरच्या बहाण्याने १५ ते २० टक्के नावे गहाळ करीत आहोत.
वर्तमान स्थितीत ८ ते १० टक्के मतदारांचा मृत्यू झाला असल्याने तसेच दुसरीकडे मतदार स्थलांतरित झाल्याने ,स्वाभाविकपणे मतदार यादीतून ही नावे गहाळ होणार आहेत.स्वत: माझ्या प्रभाग क्र.१९ मध्ये २ हजार १७३ मतदार हे स्थलांतरित झाले आहेत.एकूण ५६ हजार पैकी आता ही २ हजार १७३ नावे गहाळ होणार असल्याने हीच टक्केवारी अधिक होते.गुडधे मग या प्रक्रियेला काय म्हणणार?असा सवाल त्यांनी केला.
इतकंच नव्हे तर अलीकडेच एका वृत्तवाहिनीला तसेच त्यांच्या फेसबुक पेजवर प्रसारित झालेल्या मुलाखतीत त्यांनी माझा नावाने उल्लेख करत, “पंडित दयाशंकर तिवारी हे मोठे ज्ञानी आहेत, त्यांचा अभ्यास मोठा आहे,” असे म्हणताना “त्यांचा अंडरस्टँडिंग किती आहे” असे म्हणून हातवारे करून माझी प्रतिमा जनतेसमोर चुकीच्या पद्धतीने मांडून प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न केला. अनेक नागरिकांनी मला सांगितले की, त्या हातवाऱ्याचा अर्थ आर्थिक गैरव्यवहाराशी जोडला जात असल्याचा आभास निर्माण करण्यात आला.मी अत्यंत स्पष्टपणे सांगू इच्छितो की, दयाशंकर तिवारी कोण आहेत, त्यांचे सार्वजनिक जीवन कसे आहे, हे संपूर्ण नागपूरला माहिती आहे. मी १९९७ मध्ये प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आलो. त्यानंतर चार वेळा नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष आणि महापौर म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली.
या संपूर्ण सार्वजनिक जीवनात माझे राहणीमान, जीवनशैली आणि कार्यपद्धती नागपूरकरांनी जवळून पाहिली आहे.आजही मी कोणत्याही आलिशान निवासस्थानी राहत नाही. रस्ता रुंदीकरणामुळे मी रहात असेलेले वडिलोपार्जित घर पाडण्यात आले आणि सध्या मी झिंगाबाई टाकळी परिसरात भाड्याच्या घरात वास्तव्यास आहे. प्रत्यक्षाला प्रमाणाची गरज भासत नाही.जर मी आर्थिक व्यवहार केले असते तर मी भाड्याच्या घरात न राहता स्वतःच्या बंगल्यात राहत असतो व अनेक प्लॉट असते.त्यामुळे माझ्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे सूचक आरोप करण्याचा किंवा तसा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न पूर्णपणे निराधार आणि माझ्या प्रतिमेला धक्का पोहोचविणारा आहे.
राजकारणात वैचारिक मतभेद असू शकतात. टीका-टिप्पणीही होऊ शकते. मात्र, कोणत्याही व्यक्तीच्या चारित्र्यावर किंवा सार्वजनिक प्रतिमेवर आधारहीन संकेत देऊन शिंतोडे उडवणे ही लोकशाहीतील सुसंस्कृत राजकारणाची पद्धत नाही.म्हणूनच, मी प्रफुल गुडधे यांना आवाहन करतो की त्यांनी माझ्याबाबत केलेल्या सूचक आणि दिशाभूल करणाऱ्या विधानाबद्दल सार्वजनिकरित्या माफी मागावी. यासाठी मी त्यांना ४८ तासांचा अवधी देत आहे.अन्यथा माझ्या प्रतिमेची हानी केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कायदेशीर मार्गाचा अवलंब करत मानहानीचा दावा दाखल करण्यात येईल,असा इशारा दयाशंकर तिवारी यांनी दिला.
पत्रकार परिषदेला भाजप अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या सोबत भाजप सत्तापक्ष नेता बाल्या बोरकर,शहर महामंत्री श्रीकांत आगलावे, महामंत्री रितेश गावंडे, महामंत्री संदीप जाधव, महामंत्री मनिषाताई धावडे,संपर्क महामंत्री विष्णू चांगदे,पवन तिवारी व वैभव बावनकर उपस्थित होते.