

नवी दिल्ली : भारतात करोना आपले हात-पाय पसरतोय. मे महिन्यात सर्वाधिक रुग्ण समोर येत असल्याचं दिसतंय. शुक्रवारपर्यंत देशात जवळपास ८२ हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याच दरम्यान आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांकडून भारताला धोक्याचा इशारा देण्यात आलाय. ‘’पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया’’चे अध्यक्ष प्रोफेसर के श्रीनाथ रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार, भारताला कोविड १९ च्या समूह संसर्गासाठी अर्थात तिसऱ्या टप्प्यासाठी (corona third stage) तयार राहावं लागणार आहे.
देशव्यापी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काही प्रमाणात सूट मिळाल्यानंतर करोना आणखीन वेगात पसरू शकतो, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केलीय. काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, देशातील काही भागांत करोनाचा तिसरा टप्पा अर्थात समूह संसर्गाला अगोदरच सुरुवात झालीय. देशातील काही भागांत कोणताही प्रवास न करणाऱ्या आणि संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात न आलेले (नकळत) काही जण कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत.
आंतरराष्ट्रीय महामारी ठरलेल्या या आजाराचा समुह संसर्ग त्या देशातही दिसून आलाय जिथं याचं भयंकर स्वरुप पाहायला मिळतंय. भारतालाही यासाठी तयार राहावं लागेल, असं अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये हृदयरोग विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहिलेल्या रेड्डी यांनी म्हटलंय.
देशात समूह संसर्ग सुरू झालाय असं मानूनच देशानं यासाठी योग्य ती पावलं उचलणं गरजेचं आहे. समूह संसर्ग ही शक्यता नाही तर खराखुरा धोका आहे, असंही त्यांनी म्हटलंय.
प्रोफेसर रेड्डी यांनी देशात यापुढेही लॉकडाऊन सुरू ठेवण्याच्या निर्णयाचं समर्थन केलंय. लॉकडाऊन संपुष्टात आल्यानंतर धोका आणखीन वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केलीय.




आमचे चॅनल subscribe करा
