

नागपूर,ता. १७ मार्च: मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आज बुधवार दि.१७ मार्च रोजी २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष् प्रकाश भोयर यांना सादर केला.आयुक्तांच्या अर्थसंकल्पात कुठल्याही प्रकारचा नवा कर लावण्यात आला नाही मात्र वित्तीय शिस्त लावण्याचा निर्धार बजेट सादर केल्यानंतर पत्र परिषदेत बोलताना त्यांनी व्यक्त केला. अर्थसंकल्पात सुधारणा करीत गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ३६४ कोटींनी कमी बजेट सादर केले.मनपाचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चालू आर्थिक वर्षासाठी २ हजार ५४७ कोटींचा अर्थसंकल्प दिला होता.तर स्थायी समितीचे अध्यक्ष् पिंटू झलके यांनी करोनामुळे प्रदीर्ष लांबलेला अर्थसंकल्प ऑक्टोबर महिन्यात सादर केला.२ हजार ७३१ कोटींचे महसूलीचे लक्ष्य त्यांनी ठेवले होते.मनपा आयुक्तांनी २६०७.६० कोटींचे अर्थसंकल्प आज स्थायी समितीकडे सुपुर्द केले.
करोनामुळे महापालिकेच्या महसूलात मोठी घट झाली आहे.त्यामुळे शहरातील अनेक विकासकामे थांबली आहे,याबाबत प्रश्न विचारला असता ज्यांचे वर्क ऑर्डर निघाले आहेत त्या कामांना प्राधान्य दिले जाईल असे आयुक्तांनी सांगितले.महापालिकेची नाजूक आर्थिक स्थिती बघता राधाकृष्णन यांनी विकास कामांना प्राधान्य देणारे सुमारे जे ५ हेड्स बनविले आहेत त्या अंतर्गत मिळणारा निधी देखील अर्ध्यावर आणला आहे.या कामांसाठी मंजूर झालेला १२७.५२ कोटींचा निधी आयुक्तांनी ६३.७६ कोटींवर आणला,ही वित्तीय शिस्त लावण्यचाच प्रयत्न असल्याचे आयुक्तांच्या अर्थसंकल्पातून निर्दशनास येतं.
याप्रसंगी बोलताना केंद्र व राज्य सरकारच्या ज्या योजना सुरु आहेत त्या सर्व गतिमान करणार असल्याचे त्यांनी सांगितले.रखडलेल्या प्रकल्पास पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्राधान्य देण्यात आले असल्याचे ते म्हणाले.
जनतेवर कोणत्याही प्रकारचा नवा कर आकारण्यात आलेला नाही.नवीन कर लावण्यापेक्ष्ा कर प्राप्तीचीच व्याप्ती वाढविण्याचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.उत्पन्न वाढवण्यासाठी आहेत तेच कर योग्यरित्या संकलित करण्याकडे भर असल्याचे ते म्हणाले.
करोनाची महामारी बघता अर्थसंकल्पात काय तरतूद आहे?या प्रश्नावर बोलताना जेवढे आवश्यक आहे तेवढे केले असल्याचे त्यांनी सांगितले.किती प्रावधान केले?यावर बोलताना गेल्या वर्षी ३ कोटी होते ते आता १५ कोटी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.यात नेमके कोणत्या बाबींवर हे १५ कोटी खर्च होणार?याचा खुलासा करताना विलगीकरण केंद्र,त्यातील सोयी-सुविधा,अॅण्टीजन व आरटी-पीसीआरच्या मोफत चाचण्या,स्वच्छता कर्मचा-यांना सेनिटायझर,आरोग्य दूतांना पीपीई किट,हॅण्ड ग्लोज इ.वर हा खर्च होणार असून आरोग्य विभागाचे ५ दवाखाने अद्यावत करण्याचा प्रस्ताव आहे. इंदिरा गांधी रुग्णालय, १२६ खाटा,पाचपावली सूतिकागृह ११० खाटा,आयसोलेशन दवाखाना ३२ खाटा,आयुष हॉस्पीटल ४४ खाटा तसेच के.टी.नगर हॉस्पीटल येथे ११० खाटा असे एकूण ४२२ ऑक्सीजन बेड्स डीसीएचसीमध्ये रुपांतरीत करण्यात आले असल्याची माहीती त्यांनी दिली.
याशिवाय राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत मिनीमाता नगर व नारा येथे या आरोग्य केंद्रांसाठी ५ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.याशिवाय करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपाद्वारे नव्याने ७५ वंदे मातरम् नागरि आरोग्य सुविधा केंद्र स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने सुरु करणार असून यासाठी ३ कोटींची तरतूद केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
शहरी विकासासाठी नेमका किती निधी ठेवण्यात आला आहे?या प्रश्नावर बोलताना हा निधी जवळपास १२०० कोटींचा असून मागच्या वर्षीपेक्ष्ा हा निधी दुप्पट असल्याचे त्यांनी सांगितले.यात अमृत योजना,नागनदी प्रकल्प,सिमेंट रस्ते,स्ट्रीट लाईट्स इ.चा समावेश असल्याचे ते म्हणाले.
गेल्या वर्षीपेक्ष्ा हा अर्थसंकल्प तब्बल ३६४ कोटींनी कमी का आहे?यावर बोलताना वस्तूस्थितीला धरुन हा अर्थसंकल्प सादर केल्याचे त्यांनी सांगितले.
गर्दी टाळणे हाच लॉक डाऊनचा मुख्य उद्देश्य-
या वेळी करोना संदर्भातील प्रश्नांना उत्तर देताना शहरात अद्यापही रस्त्यांवर वाहनांची गर्दी दिसतेच,याचे कारण हा लॉक डाऊन गेल्या वर्षातील मार्च महिन्याच्या लॉक डाऊनसारखा नसल्याचे त्यांनी सांगितले.या वेळी खासगी आस्थापने २५ टक्क्यांच्या अटीसह सुरु आहेत,परिवहन व्यवस्था सुरु ठेवण्यात आली आहे,मार्च महिना असल्यामुळे लेखाजोख्याचा ताळेबंद ठेवण्यासाठी कर्मचा-यांनाही सुट देण्यात आली आहे.अत्यावश्यक सेवा सुरु आहेत त्यामुळे रसत्यांवर वाहनांची तुरळक गर्दी दिसणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी सांगितले.
अामचा उद्देशय हा गर्दी टाळणे हा असून यामुळे मॉल्स,बाजारपेठ,चित्रपटगृहे,सांस्कृतिक कार्यक्रम,धार्मिक स्थळे इ.बंद ठेवण्यात आले असल्याचे ते म्हणाले.गरज पडली तर त्यावरही निर्बंध घालण्यात येईल,असे त्यांनी सांगितले.
शहरातील अत्यावश्यक सेवेची दूकाने ही दूपारी १ पर्यंत ठेवण्याचा आदेश तुम्ही दिला यावर आणखी किती दिवस अंमलबजावणी होईल? याबाबत बोलताना आम्ही दर एक दिवसाआड निर्देशांचा आढावा घेतो,करोना बाधित वाढणे ही बाब तेवढी चिंताजनक नाही जेवढी संक्रमण वाढणे होय.गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात करोनामुळे जेवढे मृत्यू झाले त्यापेक्ष्ा मृत्यू दर अतिशय कमी झाला आहे.याशिवाय सप्टेंबर महिन्यात शहरात ५०० चाचण्या होत होत्या आता त्या १० हजार एवढ्या झाल्या आहेत.आता खासगी आणि सरकारी रुग्णालये मिळून ११०० खाटा उपचारासाठी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
करोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढेल का?यावर बोलताना हे नंतर कळेल असे ते म्हणाले.लॉक डाऊनमुळे साठेबाजीला ऊत येत असून सर्वसामान्य नागरिकांना चढ्या दराने जिन्नस विकत घ्यावी लागतात याकडे आयुक्तांचे लक्ष् वेधले असता कोणीही एमआरपीपेक्ष्ा जास्त व चढ्या दराने वस्तू विकू नये,नागरिकांनीही ऑन लाईन धान्य मागविण्याकडे कल ठेवावा असा सल्ला त्यांनी दिला,साठेबाजी करुन वस्तूंच्या किंमती वाढवल्याचे लक्ष्ात आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल,असा इशारा आयुक्तांनी दिला.
वर्ष २०२१-२१ मध्ये प्राप्त होणारे उत्पन्न
-जीएसटीतून मिळणार ४ कोटी रुपये
-मालमत्ता करातून ३३२ कोटी रुपये
-जलप्रदाय विभागातून १९५ कोटी प्राप्त होण्याचा अंदाज
-नगर रचना विभागातून १०२.६३ कोटी प्राप्त होण्याचा अंदाज
-बाजार विभागातून मिळणार १३.१९ कोटी
-स्थावर विभागातून मिळणार ६.७१ कोटी
-जाहीरात व मनोरंजन करातून मिळणार ६.७१ कोटी
-मेट्रो मॉलकडून येणा-या दोन वर्षात मिळणार ४५ कोटी
मनपाचे प्रस्तावित खर्च-
जलप्रदाय विभाग :
– २४x७ पाणी पुरवठा प्रकल्पासाठी ७८ कोटीचा प्रस्ताव; निविदा बोलवून काम करण्याचा मानस
– अमृत योजनेंतर्गत विविध प्रकारच्या कामासाठी ७२.५० कोटी अर्च अपेक्षित
– शहरातून वाहणा-या नाल्यालगत असलेल्या बगीच्यांकरिता नाल्यावर ‘मिनी एसटीपी’ बसून ते पाणी बगिच्यामध्ये वापरण्यात येणार आहे. त्यासाठी १.२१ कोटीचा खर्च अपेक्षित आहे.
बांधकाम विभाग :
– शहर सीमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा २ करिता शासन व नासुप्र यांच्या आर्थिक सहभागातून २०० कोटी प्राप्त असून उर्वरित निधी मनपाने वहन करणे आहे. सदर प्रकल्पावर अद्ययावत २२५ कोटी खर्च झालेला असून जून २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे.
– टप्पा ३ करिता शासन व नासुप्र यांच्या आर्थिक सहभागातून १२५ कोटी प्राप्त असून मनपा हिस्स्याची राशी शासन निधी तसेच बँक कर्जाच्या रक्कमेतून सुरू आहे. प्रकल्पावर अद्ययावत १०० कोटी रुपये खर्च.
प्रकल्प विभाग :
– बुधवार बाजार (महाल) येथे व्यावसायीक संकुलचे बांधकाम
– बुधवार बाजार, सक्करदरा येथे बाजारासह शॉपींग मॉलची निर्मिती
– सोख्ता भवन, कमाल चौक पाचपावली आदी जागेवर अत्याधुनिक व्यावसायीक संकुल
– मा.स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती शैक्षणिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक केंद्राचे निर्माण
– गांधीसागर तलावाचे मजबुतीकरण व सुशोभीकरण
– मेट्रो मॉल
– ‘जीजाउ स्मृती शोध संस्थान’ मौजा अंबाझरी, शंकर नगर – मनपाचा ७.४२ कोटी निधी
– प्रधानमंत्री आवास योजना सर्वांसाठी घरे (शहरी)
प्रकाश विभाग :
– सार्वजनिक विद्युत व्यवस्थे करिता २०२१-२२ मध्ये ६० कोटीची तरतूद
शिक्षण विभाग :
– इयत्ता नववी, दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यांना ‘टॅबलेट’ पुरवून ‘ॲप’द्वारे अध्ययन; करिता ३.५ कोटीची तरतूद
– विधानसभाक्षेत्र निहाय सहा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकरिता ५ कोटीची तरतूद
उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग :
– थीम बेस उद्यान तयार करणे
– रोज गार्डन
– फुलपाखरू उद्यान
– ‘फ्रेगरन्स पार्क’
– ‘ॲडव्हेन्चर पार्क’
– मियावाकी उद्यान
अग्निशमन व आणीबाणी सेवा विभाग :
– ३२ मीटर उंच हॅड्रालिक प्लॅटफॉर्म खरेदी
– अग्निशमन केंद्राचे निर्माण
– जुन्या अग्निशमन केंद्राचे पुनर्बांधकाम करिता ५ कोटी तरतूद
– फायर टेंडर व इमर्जन्सी टेंडर खरेदी करिता १७.९० कोटी तरतूद
आरोग्य विभाग :
– राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत मिनीमाता नगर व नारा नागरी सामुदायीक आरोग्य केंद्राकरिता प्रत्येकी ५ कोटी मंजुर
– महापौर श्री.दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेनुसार ७५ ‘वंदे मातरम्’ नागरी आरोग्य सुविधा केंद्राकरिता ३ कोटीची तरतूद
घनकचरा व्यवस्थापन विभाग :
– मनपाच्या सर्व दहन घाटावर एलपीजी किंवा विद्युत शवदाहिनी बसविण्याचे प्रस्तावित
– स्वच्छ भारत अभियानांतर्गत 4R (रिड्यूस, रियूज, रिसायकल, रिफ्यूज) सुत्रानुसार शून्य कचरा निर्मितीवर भर देण्याचे प्रस्तावित
– नाग नदी प्रदूषण प्रतिबंध प्रकल्पाकरिता १५ कोटीचे प्रावधान
समाजविकास विभाग :
– भीक्षेकरूंच्या पुनर्वसनाकरिता डिजिटल ॲपद्वारे सर्वेक्षण सुरू
– महिला व बालकल्याण विभागा अंतर्गत निराधार, विधवा, परितक्त्या, घटस्फोटीत महिलांकरिता योजनांवर विशेष लक्ष
– दिव्यांगांच्या सर्व कल्याणकारी योजना प्रभाविरित्या राबविणे
–
–




आमचे चॅनल subscribe करा
