

नागपूर: पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंचे भाव सातत्याने वाढत असून, दुसरीकडे करांचा बोझा सहन करावा लागत आहे. सर्वसामान्यांकडे राज्यकर्त्यांनी पार दुर्लक्ष केले, असा आरोप विकास ठाकरे यांनी केला. राज्यातील सत्तासंघर्ष, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांवरील अत्याचाराच्या वाढणाऱ्या घटनांसह देशातील एकंदरीत स्थितीवरून भाजप सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसच्यावतीने बुधवारी संविधान चौकात धरणे देण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या उपस्थितीत व नवनिर्वाचित आमदार, शहर अध्यक्ष विकास ठाकरे व जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
महागाई, बँकांची दिवाळखोरी, आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, वाढती गुन्हेगारी, जीएसटीमुळे ठप्प झालेले उद्योग धंदे, आरोग्य सेवा व शिक्षणाच्या सोयींचाअभाव यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

केंद्रात नरेंद्र व राज्यात देवेंद्र यांनी आर्थिक आघाडीवर सर्वसामान्यांचे कंबरडे मोडून अदानी, अंबानी यासारख्या उद्योगपतींना खूश केले. सरकारच्या धोरणाविरोधात शेतकरी व मध्यमवर्गीयच नव्हे तर, सद्यस्थितीत पोलिस, वकीलदेखील रस्त्यावर आले आहेत, अशी तोफ विलास मुत्तेमवार यांनी डागली. लोकसभेच्या तुलनेत विधानसभेत मतांमध्ये लक्षणीय वाढ होण्यामागे राज्यकर्त्यांविरोधात असलेला रोष व्यक्त झाला. . राज्य सरकारने दहा हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली. पण, देणार कुठून, असा सवाल काँग्रेसचे निरीक्षक सुभाष धोटे यांनी केला. भाजपने सीबीआय, ईडीचा अतिगैरवापर केल्याचे दुष्परिणाम त्यांनाच भोगावे लागत आहेत, अशी टीका आशिष दुवा यांनी केली. आंदोलनात जयंत लुटे, त्रिशरण सहारे, संजय महाकाळकर, रमेश पुणेकर, उज्ज्वला बनकर, डॉ. विठ्ठल कोंबाडे, देवा उसरे, रमण ठवकर, अर्चना बडोले, संजना देशमुख, संजय सरायकर, रिंकू जैन, रिचा जैन, पिंटू बागडी, मोतीराम मोहाडीकर, अॅड. अक्षय समर्थ सहभागी झाले होते. संचालन डॉ. गजराज हटेवार यांनी केले. आभार प्रा. दिनेश बानाबाकोडे यांनी मानले.
काँग्रेसचे सचिव व सहप्रभारी आशिष दुवा, पक्षाचे निरीक्षक सुभाष धोटे, शेख हुसेन, अतुल लोंढे, अभिजित वंजारी, हुकूमचंद आमधरे, अतुल कोटेचा, आशिष देशमुख, गिरीश पांडव, प्रज्ञा बडवाईक, प्रवीण आगरे प्रामुख्याने उपस्थित होते.




आमचे चॅनल subscribe करा
