फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजसंगीत की कोई सरहद नही होती.....

संगीत की कोई सरहद नही होती…..

Advertisements


तो आला,तो बोलला आणि त्याने जिंकले

पार्श्वगायक सुखविंदर सिंग यांचा पत्रकारांसोबत दिलखुलास संवाद

नागपूर,ता. १६ डिसेंबर २०२१: पाकिस्तानमधील कलावंत देशात आले तर त्यांना विरोध होतो मात्र संगीताला देश, काळाच्या सीमा नसतात,संगीत तर एखाद्या परिंदा सारखे आहे,पाकिस्तानचे नागरिक मला जेव्हा अमेरिकेसारख्या ठिकाणी कार्यक्रमात भेटतात तेव्हा ते कबूल करतात. त्यांच्या ह्दयात भारताच्या लता मंगेशकर,किशोर कुमार आदी यासारखे गायक कलावंत वसतात,भारताचं संगीत त्यांच्या नसात वाहतं,मात्र त्यांना त्यांच्या देशात हे बोलता येत नाही,सांगता येत नाही,त्यांनी खूलून बोलले पाहिजे,इतकंच की पाकिस्तानच्या व्यवहारामुळे आमचं पण मन आंबट होतं,आमच्या देशाच्या नागरिकाचं मन आंबट होतं,असा मनमोकळा संवाद सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुखविंदर सिंग यांनी आज प्रेस क्लब येथे पत्रकारांसोबत साधला.

याप्रसंगी मंचावर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र,नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर,प्रेस क्लबचे सदस्य व ज्येष्ठ पत्रकार महेश उपदेव,खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे जयप्रकाश गुप्ता आदी उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना ,मला नागपूर शहर खूप प्रिय असून मी नेहमी नागपूरात येत असतो असे त्यांनी सांगितले.मला नागपूरची संस्कृती आवडत असून मुंबई ही माझी कर्मभूमी तर भारत ही माझी जन्मभूमी असल्याचे ते म्हणाले.

याप्रसंगी शिरीष बोरकर यांनी त्यांचा परिचय करुन देताना त्यांना दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असल्याचा उल्लेख करताच सुखविंदर यांनी ‘गुगल‘वर कोटी करत, गुगलने वाटतं माहिती अपडेट केली नसल्यानेच मला दोन नव्हे तर तिसराही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असल्याचे हसत सांगितले.

याप्रसंगी नवीन पिढीच्या गायकांबाबत विचारले असता,संगीत ही एक संस्कृती असल्याचे त्यांनी सांगितले.पुजा पाठ आणि ‘दूआओ में भी संगीत होता है’संगीतमुळे मनोरंजन होतं,संगीत माणसाला प्रेरणा देतो,‘जग हे खास लोकांमुळे ओळखल्या जातं मात्र जगात खास लोकं हे फार कमी असतात‘असे सांगून, मी भरपूर संगीत ऐकत असतो,देश-विदेशातील महाज्ञानी कलावंतांचे संगीत ऐकतो,चित्रपट संगीत,आंतराष्ट्रीय संगीत ऐकतो आणि आनंदी होतो,असे ते म्हणाले.

नवीन पिढीने या क्षेत्रात यायलाच हवे,बाग ही फूलांमुळेच सुंदर दिसते.जितकी फूले बागेत असतात तेवढीच ती बाग सुंदर होते,ती बाग,बागच नाही जी इतर फूले आली म्हणून कोमेजून जाते, नवीन पिढीमध्ये अनुभव निश्‍चितच कमी असतो मात्र त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे,एवढंच की त्यांचे प्राण खरोखरंच संगीत मध्ये अडकलेली असावी.या प्रश्‍नावर त्यांनी बशिर बद्र ची ‘पत्थर के जिगरवालो गम मे वो रवानी है,खुद राह बना लेगा बहता हूआ पानी है’ही शायरी ऐकवली.

याच प्रश्‍नावर बोलताना,तुम्ही सतत नव्या पिढीविषयी विचारता आहात,मी खूप जास्त ‘जुना‘ तर दिसत नाही ना?अशी दिलखुलास कोटी स्वत:वरच केली.

यावेळी त्यांना पंजाब सरकारकडून मिळालेला ‘राजगायक’पुरस्काराविषयी विचारले असता,माझं घर,संसार,माझ्या आत-बाहेर,अंर्तआत्म्यात फक्त संगीत असल्याचे ते म्हणाले,संगीतपासून दूर होईल त्या दिवशी मी स्वत:पासून दूर होईल,म्हणून कितीही पुरस्कार मिळाले तरी स्वत:वर अहंकार हावी होऊ देत नसल्याचे त्यांनी सांगितले.

सुप्रसिद्ध संगीतकार ए.आर.रहमान यांच्याशी त्यांची अनबन यावर प्रश्‍न विचारला असता,माझी ओळखच ए.आर.रहमानच असल्याचे ते म्हणाले,त्यांनीच मला ’छैया छैया’गाणं देऊन चित्रपटसृष्टिमध्ये ओळख दिली.पीर बाबा बुलेशाह यांचं गाणं ‘थैया थैया’मी लहानणापासून गात आलो आहे,तेच गाणं मी रहमान यांना ऐकवले,त्यांना ते इतकं आवडलं की त्यांनी त्याच सायंकाळी पांढ-या वस्त्रामधील एका व्यक्तीला घरी बोलावून घेतले,ती व्यक्ती म्हणजे महान गीतकार गुलजार होते.त्यांच्या लेखणीतून नंतर ते अजरामर गाणं ‘छैया छैया’अवतरलं आणि इतिहास घडला. हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की मला अनेकांनी त्यांचा अनुभव सांगितला,गर्भवती माता हे गाणं जेव्हा ऐकतात तेव्हा गर्भातील बाळ देखील नाचू लागतं.

फक्त रहमान यांच्यासोबत काम करताना एकच त्रास होतो, तो म्हणजे आम्ही दिवसा काम करतो ते रात्री काम करतात,अशी कोटी त्यांनी केली.

आजच्या रिएलिटी शोबाबत त्यांना छेडले असता,रिएलिटी शो हा प्लॅटफाॅर्फ तर बेहतरीन आहे मात्र ‘तमाशा तो तमाशा’ही होता है,तरी देखील त्या तमाश्‍यामध्ये काही तर असे असेल त्यामुळे लोक त्याकडे आकर्षित होतात.या तमाश्‍यासोबत ‘दर्जा’जुळल्यास हेच शो इतिहास घडवतील,असे ते म्हणाले.

अलीकडे शास्त्रीय संगीत ऐकणारे कमी होत चालले आहेत याबाबत विचारले असता, शंभर कोटी जनता तर शास्त्रीय ऐकणार नाही मात्र ५ कोटी निश्‍चितीच शास्त्रीय गाणी ऐकतात.आजच्या काळाच्या अनुषंगाने यात बदल घडायला हवे मात्र ते बदल तांत्रिक किवा इलेक्ट्रॉनिक नसावे,संस्कृतीला कायम ठेऊन पाश्‍चात्य ‘सिम्फनी’सारखे असावे.सिम्फनीमध्ये १०० लोक एकसाथ सादरीकरण करतात.आपल्या शास्त्रीयमध्ये तीनच लोक मंचावर असतात पण जादू घडवून आणतात.

‘रिमिक्स’ बाबत विचारले असता मूळ गाण्यांचा चोरटेपणा योग्य नसल्याचे ते म्हणाले.जुन्या गाण्यांना ‘रिवाईस’करा मात्र ‘रिमिक्स’नको.यातही त्या अजरामर संगीतकांरांचे नाव रिमिक्समध्ये न देता स्वत:चे नाव देणे हा कृतघ्नपणा असल्याचे ते म्हणाले.

चित्रपटसृष्टितील ‘नेपोटिझम’याबाबत विचारले असता एवढ्या वर्षांपासून मी चित्रपटसृष्टित आहे मला याचा कधीही अनुभवन आला नसल्याचे त्यांनी सांगितले.मुंबईचं मन खूप मोठं आहे,नेपोटिझम झालं असेल तरी इतर कुठे झालं असावं किवा खूप कमीप्रमाणात झालं असेल,मला याचा अनुभव नाही.

याप्रसंगी त्यांनी मीरा नायर यांच्या ‘मानसून वेडिंग‘मधील ’रब्बा रब्बा जी करता’या गाण्याचा देखील अनुभव सांगितला.हे गाणं ऐकण्यासाठी प्रेक्षक तिकीट घेऊन शेवटी-शेवटी चित्रपटगृहात यायचे.त्यांना विचारले असता चित्रपट ठीक-ठीक आहे पण ते फक्त हे गाणं पडद्यावर बघण्यासाठी तिकीट घेत असल्याचा अनुभव सुखविंदर सिंग यांनी सांगितला.

संगीतकार विशाल भारद्वाज यांच्या प्रत्येक चित्रपटात गायलो असल्याचे सांगून सध्या त्यांच्या मुलाच्या ईच्छेप्रमाणे त्याच्याही संगीत दिग्दर्शनाखाली गाणं गायलो असल्याचे ते म्हणाले.माझे पन्नास नवीन गाणे येत आहेत ‘मी सिंसिअर नाही वागू शकत मात्र मी सिंसिअरपणे काम करु शकतो’असे ते म्हणाले.

भारताला दरवेळी ‘ऑस्कर’ची हूलकावणी मिळते,याबाबत छेडले असता ‘आपला देश हा ऑस्करचा गुलाम नाही’असे सांगून या देशातील स्वर कोणत्याही ग्रॅमी ऑस्करपेक्षा कमी नाही,‘इज्जत तो इज्जत होती है’ असे सांगून मग तो सन्मान एखाद्या झोपडीमध्ये मिळाे किवा महालात.आपल्या भारतातले समारंभ हे आंतरराष्ट्रीयतेपेक्षा कमी नाही,आपण स्वत:मध्ये सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले.माझा एक अल्बम यावेळी देखील ग्रॅमीसाठी नामांकित झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

चक दे इंडिया’या गीताबाबत अनुभव सांगताना,न्यूजिलैण्डच्या हॉकी असोसिएशने मला तेथील मैदानावर माझा सत्कार केला.यामागील कारण सांगताना भारतासोबत त्यांचा सामना सुरु असताना,हेच गाणं भारताचे खेळाडू ऐकत होते आणि न्यूजिलैण्डला त्या सामन्यात हार पत्कारावी लागली.हे गाणे उद्याच्या खासदार सांस्कृतिक महोत्सावात गाणार आहात का?या प्रश्‍नावर मिश्‍किलीने बोलत ‘नही गाऊंगा तो यही सॅटल होना पडेगा’असे ते म्हणाले.

माझ्या गाण्यांमुळे जरी मी देशात आणि परदेशात लोकप्रिय झालो असलो तरी मी अहंकाराला कधीही माझ्या जवळ येऊ दिले नाही.एकदा परदेशात मी गेलो असता गर्दीच्या ठिकाणी माझ्याकडे बोट दाखवत तेथील लोक ’हा भारताचा गायक आहे’अशी माझी ओळख सांगत होते ’हा सुखविंदर सिंग आहे’अशी ओळख माझी ते सांगत नव्हते.

उद्या शुक्रवार दि. १७ डिसेंबर रोजी ईश्‍वर देखमुख शारिरीक महाविद्यालयाच्या प्रांगणात खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या उद् घाटन प्रसंगी पार्श्वगायक सुखविंदर यांचा ‘चक दे इंडिया कॉसर्ट’चे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला नागपूरकरांनी आवार्जून येण्याचे आवाहन त्यांनी केले.

पत्रकारांच्या विशेष आग्रहातून त्यांनी संवादाचा समारोप आपल्या सुरेल आवाजातील ’होले होले हवा लगती है’हे गीत गुणगुणत केला.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या