

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त केली प्रस्तुती
नागपूर,ता. २२ एप्रिल २०२३: भारत सरकार, माहिती व प्रसारण मंत्रालय ,केंद्रीय संचार ब्युरो, प्रादेशिक कार्यालय, वर्धा, महाराष्ट्रतर्फे एक दिवस आधी २१ एप्रिल २०२३ रोजी जागतिक वसुंधरा दिन निमित्त यशवंत महाविद्यालय, वर्धा येथे सकाळी ११ वाजता एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राष्ट्रभाषा परिवार सामाजिक सांस्कृतिक संस्थेच्या कलाकारांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यासाठी “आमची वसुंधरा” हे पथनाट्य सादर केले.
पथनाट्यात मानवाच्या अति हव्यासामुळे होणारे जल-वायू-मृदा प्रदूषण आणि पर्यायाने पृथ्वीच्या तापमानात होणारी वाढ म्हणजेच ‘ग्लोबल वॉर्मिंग’ या विषयी विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले.
त्याचबरोबर प्लॅस्टिकचा शोध आणि त्याचा अती वापर त्यामुळे वाढत चाललेल्या समस्यांमुळे आजची बिघडलेली पृथ्वीची स्थिती याकडेही उपस्थितांचे लक्ष वेधण्यात आले.
पथनाट्याच्या माध्यमातून मनोरंजनासोबतच युवकांना आजपासूनच सवयी बदलण्याची शपथ देण्यात आली.
कार्यक्रमात जिल्हा परिषद वर्धाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र बेले, प्रादेशिक जनसंपर्क ब्युरोचे मुख्य अधिकारी वर्धा राऊत व महाविद्यालयातील इतर शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात राजाराम शुक्ल,अध्यक्ष-राष्ट्रभाषा परिवार सामाजिक सांस्कृतिक संस्था, नागपुर
सुरेशबाबू अग्रवाल,सचिव- राष्ट्रभाषा परिवार सामाजिक सांस्कृतिक संस्था, नागपुर यांचे विशेष सहाय्य मिळाले.
पथनाट्यात पुष्पक भट, शुभम गौतम ,निकिता ढाकुलकर , मयूर मानकर , अंकित ठाकरे ,अरबाज शहा ,प्रीति शर्मा , दुर्गेश कुहिके यांनी सादरीकरण केले.
…………………..




आमचे चॅनल subscribe करा
