

पदवीधर निवडणूक: उमेदवार नितिन रोंघे यांचा सवाल
नागपूर,ता. २२ नोव्हेंबर: भंडारा येथून नागपूर विभागासाठी पदवीधर मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज भरणारे विदर्भवादी उमेदवार नितीन रोंघे यांनी प्रचारादरम्यान ‘ मी काल ही विदर्भवादी होतो,आज ही आहे,उद्या पण असणार’ असे सांगून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय जीवन सुरु झाल्यापासून तर २९ ऑक्टोबर २०१४ रोजी दुपारी ३ वाजून ५९ मिनिटां पर्यंत फडणवीस हे स्वतंत्र विदर्भ राज्याचे कट्टर समर्थक होते आणि ४ वाजता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्या बरोबर त्यांना विदर्भाचा विसर पडला,असा सणसणीत आरोप त्यांनी प्रचारादरम्यान केला.
त्यांच्या पक्ष्ाचे उमेदवार संदीप जोशी यांनी देखील उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बेरोजगारी तसेच विदर्भावर होणा-या अन्यायाबाबत बोलले,विदर्भावर होत असलेल्या अन्याया विरोधात मी पण ही निवडणूक लढतोय,आता जोशी यांना बरोबर विदर्भाचा मुद्दा आठवायला लागला आहे कारण निवडणूक सुरु आहे. मी मात्र एकच सांगतो,मी जगेन तर विदर्भासाठी,मरेन तर विदर्भासाठी,मी कट्टर विदर्भ राज्याचा समर्थक आहे.माझं हे स्पष्ट मत अाहे जोपर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य होत नाही तोपर्यंत विदर्भाचा विकास होऊच शकत नाही.आपण जरी पुढले एक हजार वर्ष महाराष्ट्रात राहीलो तरी विदर्भाचं कोणतही भलं होणार नाही,असे ते म्हणाले.
स्वतंत्र विदर्भ राज्य आणि विदर्भाचे प्रश्न या एकमेव अजेंडावर मी ही निवडणूक लढतोय असे त्यांनी सांगितले.अनेकांनी विदर्भ राज्याचा मुद्दा निवडणूक जिंकण्यापुरती उचलला,दुर्देवाने सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांचे पाय हे विदर्भाच्या मुद्दावर मातीचेच निघतात,अशी बोलकी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
रोंघे यांच्या मते १९५६ च्या नागपूर कराराप्रमाणे विदर्भातील बेरोजगारांना सरकारी नोक-यांमध्ये २३ टक्के प्राथमिकता मिळाली पाहिजे,विदर्भाच्या सिंचनाचा बॅकलाक भरला गेला पाहिजे होता,विदर्भात पर्यटन स्थळे विकसित केली गेली पाहिजे,शेतक-यांचा विकास व योग्य हमीभाव तसेच विदर्भाचा औद्योगिक विकास आतापर्यंत घडवून आणायला पाहीजे होता,मात्र नागपूर करारामध्ये उल्लेखलेल्या यातील कोणत्या बाबींची पूर्तता आजवरच्या सत्ताधा-यांनी केली?असा सवाल त्यांनी प्रचारादरम्यान उपस्थित केला.
थोडक्यात रोंघे यांची उमेदवारी भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचे बोलले जात आहे तर इतर उमेदवारांसाठी काट्याची टक्कर असणार आहे.नागपूर मंडळासाठी मतदान १ डिसेंबर रोजी होणार आहे.रोंघे यांना विदर्भातील कार्यकर्त्यांच्या आवाजाच्या रुपात उमेदवारी देण्यात आली.विदर्भ राज्य मोर्चा,विदर्भ राज्य पक्ष्,बळीराज पक्ष्,राष्ट्रीय जनसुराज्य पक्ष्,राष्ट्रीय जनविकास पक्षाचे समर्थन मिळाले आहे.




आमचे चॅनल subscribe करा
