

भाजपचा डाव अयशस्वी:रेवतकर यांचा आरोप
संप संपला ‘आपली बस‘ धावल्या :नागरिकांनी सोडला सुटकेचा श्वास
दीडशे तर सोडा एकाही चालक-वाहकाला निलंबित केले नव्हते:बंटी कुकडे खोटारडा:बाल्या बाेरकर इमानदार माणूस
नागपूर,ता.५ मार्च २०२२: नागपूरकर नागरिक असणा-या लाखो सामान्य प्रवाश्यांसाठी ‘आपली बस’हे परिवहनाचे एकमेव महत्वाचे साधन आहे.नुकतेच शाळा महाविद्यालय देखील सुरु झाले व दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परिक्षांचा तनाव देखील विद्यार्थी-पालक वर्गावर आला असतानाच अचानक १ मार्च पासून आपली बसचे कर्मचारी हे बेमुदत संपावर गेले.शहरातील परिवहन यंत्रणा सध्या चार खासगी एजंसी चालवित आहेत.या चारही एजंसीच्या वाहक-चालक असणा-या कर्मचा-यांनी पगार वाढीचा मुद्दा समोर करुन संप पुकारला.यात सामान्य नागपूरकर भरडला गेला.मनपात सत्ताधारी भाजपचे परिवहन समितीचे अध्यक्ष बंटी कुकडे यांनी शंभर वाहक व ५० चालकांना निलंबित केले असल्याचे पत्र परिषदेत सांगितले मात्र कुकडे हे एक नंबरचे खोटारडे असून एकाही चालक-वाहकाला निलंबितच करण्यात आले नसल्याचा दावा विदर्भ कामगार सेल काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष लालसिंग ठाकूर यांनी केला तर भाजपचा डाव अयशस्वी झाल्याची टिका शिवसेना वाहतूक सेनेचे अध्यक्ष भाऊराव रेवतकर यांनी केली.
काल ४ मार्च रोजी मनपाचा कार्यकाळ संपल्याने कुकडे हे देखील पायउतार झाले व आज शनिवार दि.५ मार्च रोजी काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या मध्यस्थीने लालसिंग ठाकूर यांनी पगार वाढीच्या मुद्दावर आता कामागार आयुक्त व नागपूर महानगरपालिकेला प्रतिवादी करीत न्यायालयात लढा देण्याचा निर्णय घेत संप मागे घेतला असल्याची माहिती ‘सत्ताधीश’ला दिली.

परिवहन विभागाचे अधिकारी पागे यांनी देखील आज नागपूरच्या रस्त्यावर २७० बसेस धावल्या असल्याचे सांगून सकाळी ११ वाजेपर्यंत ६० बसेस धावल्या यानंतर दिवसभरात ९९ टक्के बसेस रस्तयावर उतरल्या असल्याची माहिती दिली.कुकडे यांनी कार्यकाळ संपण्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात ४ मार्च रोजी देखील प्रशासनाला बजावत,काहीही झाले तरी दीडशे निलंबित संपक-यांना पुन्हा कामावर घ्यायचे नाही असा दम दिला होता,ते पायउतार होताच त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत मनपा प्रशासनाने सामंजस्याची भूमिका घेत एजंसीच्या कामात ढवळाढवळ न करता कोणत्याही कर्मचा-यांचे निलंबन न करता सुरळीत बसेस धावण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून पडले.
बंटी कुकडे पैश्यांच्या भरवश्यावर नगरसेवक व कोणाच्या भरवश्यावर परिवहन समिती सभापती झाला हे सर्वांना माहिती असल्याची जळजळीत टिका लालसिंग यांनी केली.मी ३८ वर्षांपासून राजकारणात आहे मात्र एका नगरसेवक पदाची देखील निवडणूक लढण्याची ताकद माझ्यात नाही,सत्ताधा-यांना एजंसींकडून ‘टक्केवारी’मिळत होती,निवडणूकी आधी या एजंसींचा करार रद्द करुन मेट्रोच्या घश्यात मनपाची परिवहन यंत्रणा घालण्यासाठीच हा संपूर्ण घाट घालण्यात आला असल्याचा आराेप लालसिंग ठाकूर यांनी केला.यासाठी कुकडे यांच्या गोटातील एक ‘महिला’ सतत पुढाकार घेत होती,कामगारांची दिशाभूल करीत होती मात्र आम्ही वेळीच सावध झालो,आम्हालाही जनतेच्या व्यथा कळतात,आमची मागणी फक्त शासनाच्या २०१५ च्या परिपत्रकाच्या आधारे वेतन लागू करण्याची होती.
मनपा आम्हाला २०१० च्या शासन अध्यादेशानुसार वेतन प्रदान करीत आहे.त्यामुळे १५ ते २० वर्षे नोकरी करुन देखील बस चालकांना १२ ते १३ हजार तर वाहकांना ८ ते १० हजार रुपये पगार मिळत आहे. आमच्यापेक्षा जास्त तर मनपातील कंत्राटदारांनी नियुक्त केलेल्या संगणक ऑपरेर्ट्सला १८ ते २५ हजार रुपये पगार ’ऑन पेपर’मिळत आहे.
आम्ही फक्त न्याय मागणी केली होती.बंटी कुकडेवर आमचा विश्वास कधीही नव्हता.माजी परिवहन समिती अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी मात्र आमच्या पगार वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले होते.पदाधिका-यांना ‘टक्केवारी’देणा-या मात्र कर्मचा-यांचे रक्त चुसणा-या या चारही एजंसीजचा करार रद्द करुन नव्या एजंसी नियुक्त करने व नव्या एजंसीद्वारे २०१५ च्या शासन अध्यादेशानुसार आपली बस कर्मचा-यांना वाढीव पगार देण्यासाठी संपूर्ण कागदोपत्री प्रक्रिया बाल्या बोरकर यांनी पूर्ण केली होती मात्र एका मंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे बाल्या बोरकर यांची उचलबांगडी झाली व मंत्र्यांचा ‘पोपट’ बंटी कुकडे याची नियुक्ती झाल्याचा आरोप लालसिंग ठाकूर यांनी केला.बाल्या बोरकर यांनी कर्मचा-यांच्या इएल,पीएल,सीएल,वेतन,पगारवाढ,बोनस इ.साठी नव्या एजंसीज नेमण्याची प्रक्रिया सुरु केली होती,असे लालसिंग यांनी सांगितले.
बंटी कुकडे सातत्याने मिडीयाची दिशाभूल करीत होता.संप,निलंबन,अध्यादेश इ.बाबत खोटे दावे करीत होता.आम्हाला नागपूरकर जनतेला वेठीस धरायचे नव्हते मात्र आमच्याकडे पर्याय नव्हता.
आमच्या संघटनेची बदनामी,मनपाची बदनामी होणे आणि जनतेच्या नजरेत आम्हाला विलेन बनायचे नव्हते त्यामुळेच आम्ही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी चर्चा केली,त्यांच्या सूचनेनुसार आम्ही आता कामगार आयुक्त व मनपाला प्रतिवादी करुन आपल्या न्याय हक्कासाठी न्यायालयात दाद मागू,असे लालसिंग यांनी सांगितले.मायबाप जनतेनेच आज सांगावे आजच्या काळात ८ ते १० हजारात वाहकाचे आणि १० ते १२ हजारात चालकाचे घर चालते का?पुण्यात वाहक-चालकांना २० ते २२ हजार रुपये पगार मिळतोय मग नागपूरातील एजंसीज २०१५ च्या शासन अध्यादेशप्रमाणे आम्हाला वेतन का देत नाही?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
भाजपची ’नौटंकी’संपली यातच आम्हाला आनंद असल्याची खोचक टिका लालसिंग यांनी केली.
पागे यांना कर्मचा-यांच्या निलंबंनाबाबत व बंटी कुकडे यांच्या सूचनेविषयी विचारणा केली असता कुकडे यांच्या सूचनेवर दीडशे कर्मचा-यांचे निलंबन करण्यात आले होते मात्र ऐन वेळी एजंसीजकडे पर्यायी व्यवस्था नसल्याने मनपा प्रशासनाने एजंसींज व कर्मचा-यांच्या कारभारात कोणताही हस्तक्षेप न करता बसेस रस्तयावर धावण्याला प्राधान्य दिले असल्याचे पागे यांनी सांगितले.
यासंबंधी बंटी कुकडे यांना संपर्क केला असता कॉल उचलण्यात आला नाही.




आमचे चॅनल subscribe करा
