

समाजमन हळहळले:करोनामुळे नोकरी सुटल्याचा संशय
नागपूर,ता. १८ ऑगस्ट: पती-पत्नी दोघेही उच्चशिक्षित.पती प्राध्यापक तर पत्नी डॉक्टर.एक मुलगा व एक मुलगी असा सुखी आणि संपन्न परिवार.पण काळानी घाला घातला आणि काल रात्री १२ वाजतानंतर या दाम्पत्याने आपल्या दोन्ही चिमुरडयांसह आत्महत्या केली.मध्यरात्री असे काय घडले की या उच्चशिक्षित दाम्पत्याने असे टोकाचे पाऊल उचलले.याबाबत विविध तर्कवितर्क लावले आत आहे मात्र कोणालाही अंदाज लावता येत नाही, फक्त हळहळ व्यक्त होत आहे.
उच्चशिक्षित दाम्पत्याने आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केल्याची घटना अंगावर शहारा आणणारी आहे.ही घटना आज शहराजवळच्या कोराडीतील संत जगनाडे सोसायटी,ओमनगर, कोराडी नाका येथे घडली.प्रा.धीरज राणे(४२)डॉ.सुषमा धीरज राणे(३८)ध्रुव(११)वन्या(५)अशी मृतांची नावे आहेत.

धंतोली येथील अवंती रुग्णालयात कार्यरत असलेल्या डाॅ.सुषमा आणि रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे प्रोफेसर असलेले त्यांचे पती प्रो.धीरज राणे यांनी मुलगा ध्रुव तसेच मुलगी वन्यासह मृत्यूला कवटाळल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली .आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यांच्या खोलीत पोलीसांना एक मृत्यूपूर्वी लिहलेली चिठ्ठी प्राप्त झाली असून,त्यात कोणाकोणाला किती देणी बाकी आहे,या कर्जांचा लेखाजोखा असल्याचे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले. डॉक्टरांची ६५ वर्षीय वयोवृद्ध आई की आत्या सोबत राहत होती,असे सांगितले जात आहे.
हे कुटुंब दररोज पहाटेच उठून जात होते मात्र मंगळवारी सकाळी ९ वाजूनही भाचा,सून,नातवंडे कोणीही अद्याप खोलीच्या बाहेर न पडल्याने आत्या प्रमिला यांनी आवाज दिला. यावेळी सुषमा यांनी अजून झोप झाली नसल्याचे सांगितले. दूपारी दीडच्या सुमारास आत्या प्रमिला यांना प्रो.धीरज यांच्या खोलीचे दार अर्धवट उघडे दिसल्याने प्रमिला या आत गेल्या.धीरज ,ध्रुव आणि वन्या पलंगावर निपचित पडून होते तर बाजूच्या खोली डॉ.सुषमा या गळफास घेऊन लटकलेल्या होत्या! प्रमिला यांनी आरडाओरड करीत बाजूच्या किराणा दूकानदाराला हाक मारली.नंतर स्वत:च्या मुलीला फोन केला तसेच डॉ.सुषमा यांच्या भावाला फोन करुन घटनेची माहिती दिली.नियंत्रण कक्ष्ातही फोन केला.नियंत्रण कक्ष्ाने कोराडी पोलीसांना कळवले. त्यानुसार ठाणेदार वजीर शेख हे घटनास्थळी आपल्या ताफ्यासह पोहोचले.

एकाच कुटुंबातील चार मृतदेह हे संशयास्पद स्थितीत आढळल्यामुळे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ.शशिकांत महावरकर,पोलीस उपायुक्त नीलोत्पल,गुन्हे शाखेची पथके तसेच ठसे तज्ज्ञ आणि फॉरेनिस्क चमू ही देखील पोहोचली. प्रो.धीरज,ध्रुव व वन्याचे मृतदेह जेथे होते तिथे इंजेक्शनच्या दोन रिकाम्या सिरींज आढळल्या. पोलीसांनी त्या ताब्यात घेतल्या.एकूणच घटनाक्रमावरुन राणे दाम्पत्यापैकी एकाने दोन मुलांसह तिघांची हत्या करुन स्वत:आत्महत्या केली असावी,असा संशय व्यक्त केला जात आहे.
मध्यरात्री १२ वा.च्या सुमारास दाम्पत्यांशी वयोवृद्ध आईचे बोलणे झाले होते,असे एका निकटवर्तीयांनी सांगितले.कोराडी पोलीसांनी घराचा ताबा घेतला असून,ठोस पुराव्यांशिवाय हत्या कि आत्महत्या? अश्या कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचता येत नसल्याचे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी सांगितले. पोलीस निरीक्ष् क वजीर शेख यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरु आहे.
या घटनेची वार्ता बघता बघता संपूर्ण आजूबाजूच्या परिसरात व गावात पसरली.त्यामुळे मोठ्या संख्येने बघ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली.ऐन पोळ्याच्या दिवशी एका सुखवस्तू कुटुंबाने असे आत्मघातकी पाऊल उचलल्याने संपूर्ण दिवसभर हीच चर्चा घरोघरी सुरु होती.
करोनामुळे नोकरीवर आले होते गंडांतर!
सध्या करोनाच्या भीषण महामारीच्या काळात अनेकांच्या नोकरीवर गंडांतर आले आहे. अनेक महाविद्यालयाच्या संचालकांनीसुद्धा अनेक प्राध्यपकांना घरी बसवल्याची वार्ता आहे तर अनेकांचा पगार फक्त २५ टक्के केला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्ष् णिक नुकसान होऊ नये म्हणून आॅन- लाईन शिकवणी वर्ग सुरु असले तरी या शिकवण्या अनेक संचालक हे शासकीय प्राध्यापकांकडून संचालित करुन घेत आहे. आपल्या महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना पूर्ण पगार देण्याऐवजी,दोन-तीन ऑन लाईन शिकवणी वर्गाचे पैसे अश्या शासकीय प्राध्यापकांना देण्याचे परवडत असल्याने अनेकांच्या नोकरीवर गंडांतर आले आहे.
या घटनेत देखील जी सुसाईड नोट सापडली त्यात कोणाकोणाला किती रकमेची परतफेड करणे आहे,याचा लेखाजोखा लिहला आहे,याचा अर्थ कर्जाचे हप्ते थकल्याने राणे कुटुंबिय हे तनावात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.आर्थिक कारणामुळे हे टोकाचे पाऊल उचलले गेल्याचे सांगितले जात आहे.
थोडक्यात करोनाने केवळ गरीब आणि मध्यमवर्गीय,निम्न मध्यमवर्गीयांनाच नव्हे तर सुखवस्तू कुटुंबियांना देखील आत्महत्येच्या कवेत घेण्यास सुरवात केली,अशी चर्चा आता ऐकू येत आहे!




आमचे चॅनल subscribe करा
