फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमनाला भिडणारी पियुष मिश्रा यांची ‘बल्‍लीमारन’ प्रस्‍तुती

मनाला भिडणारी पियुष मिश्रा यांची ‘बल्‍लीमारन’ प्रस्‍तुती

Advertisements

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा आठवा दिवस

नागपूर, १ डिसेंबर २०२३: गायक, गीतकार, संगीतकार, अभिनेते पियुष मिश्रा यांनी ‘बल्‍लीमारन’ च्‍या माध्‍यमातून समाजाच्‍या परिस्थितीवर कधी परखड, कधी विनोदी शैलीत तर कधी भावनिक भाष्‍य करणा-या कविता आपल्‍या खास शैलीने सादर करून रसिकांना मंत्रमुग्‍ध केले. दिल्‍लीत मिर्झा गालीब जेथे राहायचे, त्‍या ठिकाणच्या नावावरून प्रेरित होऊन पियुष मिश्रा यांनी ‘बल्‍लीमारन’ हा बँड तयार करून थेट हृदयाचा ठाव घेणारी गाणी सादर करण्‍याची स्‍वतंत्र शैली तयार केली असून ती देशविदेशात बरीच लोकप्रिय झाली आहे. परिस्थितीवर थेट भाष्‍य करणा-या या शैलीला विशेषत: तरुणाईने डोक्‍यावर घेतले आहे. खासदार सांस्‍कृत‍िक महोत्‍सवाच्‍या आज आठव्‍या दिवशी त्‍याची प्रचिती आली.

आजच्‍या या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्‍याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्‍ट्र टाईम्‍सचे संपादक श्रीपाद अपराजित, खा. कृपाल तुमाने, प्रविण दटके, परिणय फुके, नागो गाणार, विकास महात्‍मे, आशीष जयस्‍वाल, पियुष मिश्रा यांच्‍या हस्‍ते दीपप्रज्‍वलनाने झाले. यावेळी पियुष मिश्रा व अरुणा भिडे यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला.

सुरुवातीला पियुष मिश्रा यांनी ‘उस रात शहर में खून की बारीश आयी रे’ या काव्‍यातून आजच्‍या गंभीर परिस्थितीवर भाष्‍य केले आणि वातावरण गंभीर केले. आताशा लोक जुन्‍या कथा, कहाण्‍या, गाणी विसरले असून त्‍यातला आनंद गमावला आहे. थोडे थांबून श्‍वास घेऊन परत एकदा त्‍या जुन्‍या आठवणी ताज्‍या करा, असे म्‍हणत ‘थोडा नजारा, चटपट बाते, यही कहानी, आते-जाते’ हे गीत सादर केले. त्‍यानंतर ‘डेन्‍मार्क के हालातों में…’ हे मजेशीर गीत सादर केले. आपला देश कन्‍फयूज हॅम्‍लेटचा बिघडलेला डेन्‍मार्क झाला नाही, याचा आनंद असल्‍याचे त्‍यांनी या कवितेतून सांग‍ितले आहे. ‘वो सुहाने दिन, आशिकाने दिन’ या गीतातून तारुण्‍यातील रोमँटिक दिवसांच्‍या आठवणी ताज्‍या केल्‍या.

विशाल भारद्वाजने लिहिलेले गीत ‘कही पे लडकी जाए लुडकी’, मुंबईवर आधारित ‘रात है नशे में’, ‘नवी चवन्‍नी’, ‘एक बगल में चांद होगा’ अशी अनेक गीते त्‍यांनी यावेळी सादर केली व रसिकांना आनंद दिला. रसिकांकडून ‘हुस्‍न’, ‘आरम्‍भ’ या गीतांची वारंवार मागणी होती. ती त्‍यांनी पूर्ण केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळ कुळकर्णी, रेणुका देशकर व अभिजित मुळे यांनी केले. महोत्‍सवाच्‍या यशस्‍वीतेसाठी खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष प्रा. मधूप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्‍दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर,गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, अॅड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर यांचे सहकार्य लाभत आहे.
…….
महोत्‍सवातून सांस्‍कृतिक मूल्‍यांचे जतन: नितीन गडकरी
खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवातून प्रबोधन, प्रशिक्षण, संस्‍कार आणि मनोरंजन असा योग साधला जातो. यावर्षी आध्‍यात्मिक उपक्रमांनादेखील नागरिकांचा उत्‍तम प्रत‍िसाद लाभला. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाचा अंगिकार करून केलेली आर्थिक प्रगती म्‍हणजेच देशाचा विकास नसून सांस्‍कृतिक प्रगतीपण होणे आवश्‍यक असते. त्‍यासाठी खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव असून त्‍यामाध्‍यमातून सांस्‍कृतिक मूल्‍यांची जोपासना होते आहे, असे मत नितीन गडकरी यांनी व्‍यक्‍त केले.
……
स्‍थानिक कलाकारांना मिळाला मंच: देवेंद्र फडणवीस
नितीन गडकरी यांनी नागपूर व विदर्भाला क्रीडा आणि सांस्‍कृतिक असे दोन अतिशय महत्‍वाचे महोत्‍सव दिले आहेत. विदर्भातील कानाकोप-यातील प्रत्‍येक व्‍यक्‍तीचा सहभाग या महोत्‍सवांमध्‍ये बघायला मिळतो आहे. महत्‍वाचे म्‍हणजे देशातले उत्‍तमातले उत्‍तम कलाकार येथे आपली कला सादर करत असताना स्‍थानिक कलाकारांना आपले कलागुण प्रस्‍तुत करण्‍याची संधीही याच मंचावर उपलब्‍ध करून दिल्‍याबद्दल नितीन गडकरी यांचे आभार मानतो, असे उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस म्‍हणाले. त्‍यांनी देशाच्‍या संघर्षाचा अँथम तयार करणारे पियुष मिश्रा यांचेही कौतुक केले.
……..
सर्वांगीण विकासात गडकरींचे योगदान मोठे: मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे

राज्‍याच्‍या उपराजधानीत राष्‍ट्रीय-आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरचे कलावंत येतात. विदर्भातले नागपूरमधले स्थानिक कलाकार हजारोच्‍या संख्‍येने या व्‍यावसायिक कलावंतांसोबतच आपली कला या मंचावर सादर करतात. हा सांस्‍कृतिक महोत्‍सव नागपुरात सुरू केल्‍याबद्दल नितीन गडकरी यांचे धन्‍यवाद व्‍यक्‍त करतो. राज्‍य व देशाच्‍या सर्वांगीण विकासात नितीन गडकरी यांचे योगदान मोठे आहे, असे मत मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्‍यक्‍त केले.

‘राम रतन धन पायो’ ने केला रामभक्‍तीचा जागर-

आनंदी ग्रुपच्‍या ‘राम रतन धन पायो’ या नृत्‍यनाटिकेत श्रीरामाच्‍या भक्‍तीचा जागर करण्‍यात आला. या नृत्‍यनाटिकेचा हा ५० वा प्रयोग होता. याचे लेखन व दिग्‍दर्शन अरुणा भिडे यांचे होते तर यातील सर्व पात्रे मह‍िलांनी साकारली होती. रामायणातील शबरी, जटायू, वाल्‍या अशा अनेक प्रभू रामाशी संबंधात कथा नृत्‍यनाटिकेच्‍या माध्‍यमातून साकार करण्‍यात आल्‍या. डॉ. भाग्‍यश्री चिटणीस, अभय पांडे, सई चिटणीस यांनी यातील गाणी सादर केली तर विवेक खापरे, अभय गोसावी व विशाल दहासहस्‍त्र यांनी वाद्यसंगत केली. निवेदन अरुणा भिडे यांचे होते. पुर्वा कुसरे-अय्यर, दीपा दाभोळकर, पल्‍लवी मुलमुले, मधुरा देशपांडे, नेत्रा राणे, कल्‍याणी गोखले, आरती देशपांडे, अर्चना भिडे, स्‍म‍िता फुटाणे, पल्‍लवी देशपांडे, अर्चना लपालकर, रश्‍मी मुळवाने, कल्‍याणी वेलणकर, कविता गोसावी, पल्‍लवी उपदेव आदींचा यात सहभाग होता.

बोलो ‘ राम सियाराम, सियाराम जय जय राम ‘

जनकल्याणासाठी खासदार सांस्कृतिक महोत्सवात सुंदरकांड पठण आयोजित

जनकल्याणासाठीचा संकल्प सोडून आज सकाळच्या प्रहरात वाद्य आणि संगीताच्या साथीने खासदार सांस्कृतिक महोत्सवात ‘जागर भक्तीचा’ अंतर्गत सुंदरकांड पठणाचा कार्यक्रम सुफळ संपन्न झाला.’ जय बजरंग रामायण मंडळ’, पोलीस लाईन टाकळीच्या’ भाविकांनी कर्णमधुर अश्या सुंदरकांड चे प्रभावी सादरीकरण केले. यावेळी सुरवातीला आणि शेवटी बोलो ‘ राम सियाराम, सियाराम जय जय राम ‘ ने परिसर निनादून गेला. जयप्रकाश गुप्ता यांनी कार्यक्रमाच्या सुरवातीला संकल्प घेतला आणि त्यांनतर उपस्थित मान्यवरांनीं श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाच्या प्रतिमेचे पूजन केले. मंत्रोच्चर आणि एकमुखाने गजर याचे विलक्षण भक्तिमय दृश्य यावेळी बघायला मिळाले.

तत्पूर्वी संस्कार भारतीच्या अध्यक्षा कांचन गडकरी, साध्वी सूर्यप्रभा, मुन्नाजी छांगाणी, जयप्रकाशजी गुप्ता कार्यक्रमाच्या संयोजिका रंजना गुप्ता, अमृत वक्ता विवेक घळसासी, अरविंद हाडे, संतोष मोदी, दीपक झरगट, मायाताई हाडे, विनोद गुप्ता, प्रमुख संयोजक मुन्नाजी ठाकूर यांचा आदर सत्कार करण्यात आला.

याशिवाय अप्रतिम अश्या सादरीकरणासाठी सुंदरकांड पठण करणाऱ्या चमूचा देखील सत्कार खासदार सांस्कृतिक समितीच्या वतीने कार्यक्रमाच्या शेवटी करण्यात आला. जयप्रकाश गुप्ता यांनी मुन्ना ठाकूर यांचा आदर सत्कार केला, चंद्रशेखर दुबे यांचा सत्कार विवेक घळसासी यांनी केला तर रंजना गुप्ता यांचा सन्मान देखील जयप्रकाश गुप्ता यांनी केला. कार्य्रमाच्या शेवटी हनुमान चालिसाचे पठण,आरती आणि प्रसाद वितरण झाले. रेणुका देशकर यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. हजारो भाविकांनी या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घेतला.

आज महोत्‍सवात …
सकाळी ६.३० वाजता – श्री सुंदरकांड पठण
सायंकाळी ६.०० वाजता – परिणीता मातुरकर यांचा गीत गायन कार्यक्रम
सायं. ६.३० वाजता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या कार्यावर आधारित ‘संविधान शिल्पकार’ महानाट्य
……..

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या