

आभा पांडे यांनी वेधले लक्ष् : महापौरांचे आयुक्तांना चौकशीचे आदेश
नागपूर,ता. २२ जुलै: उपराजधानीत याच वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात करोना संसर्गामुळे हजारो बाधितांचा मृत्यू झाला,हा काळ असा होता की महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरातील सर्व अकरा ही दहनघाटांवर मृतदेहांच्या रांगा लागलेल्या असल्याचा अतिशय थरारक अनुभव नागपूरकरांनीच नव्हे तर देशभरातील नागरिकांनी अनुभवला.नागपूरातील दहनघाटावरील ते भीषण व दूर्देवी मृत्यूंचे व्हिडीयोज हे देशभरात व्हायरल झाले होते.
अशा वेळी शांतीनगर दहनघाट येथील शवदाहीनीचे काम ६ महिन्यांत पूर्ण झाले असते तर करोनाच्या त्या पीक पीरीयडमध्ये नागपूरकर नागरिकांना थोडा तरी दिलासा मिळाला असता. मात्र गेल्या ४ वर्षांपासून या शवदाहीनीचे काम कंत्राटदाराने रखडून ठेवले असून या कामाचे कंत्राटदाराला १२ लाख रुपये देखील देण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांनी आज मनपाच्या सभेत दिली.यावर महापौर दयाशंकर तिवारी यांनी या प्रकरणी अधिका-याला कारणे दाखवा नोटीस बजावून कंत्राटदाराची चूक असेल तर त्याच्यावरही कारवाई करा,असे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांना दिले.
खासदार अविनाश पांडे यांनी खासदार निधीतून एलपीजी शवदाहीनीसाठी ४९ लाख रुपये मंजूर केले होते.२०१७ मध्ये शांतीनगर घाट येथे एलपीजी शवदाहिनीसाठी महापालिकेने कार्यादेश काढले.एवढंच नव्हे तर कंत्राटदाराला सहा महिन्यात काम पूर्ण करण्याचा कालावधी देण्यात आला होता.
परंतु आजपर्यंत केवळ ढाचा तयार करण्यात आला.आता तेथे सतत कुत्र्यांचा वावर असतो,खासदार पांडे यांनी श्वानांसाठी हा निधी दिली होता का?असा परखड सवाल आभा पांडे यांनी मनपा सभेत केला.
या कामासाठी कंत्राटदाराला १२ लाख रुपये देण्यात आले होते,त्याचे काय झाले?या प्रश्नाच्या उत्तरावर कंत्राटदाराने १४ लाखांचे काम केले असून त्याला १२ लाख रुपये देण्यात आले असल्याचे अधीक्ष् क अभियंता अजय पोहेकर यांनी माहिती दिली.या प्रकल्पातील काही निधी अद्यापही प्राप्त झाला नाही,त्यामुळे आता या निधीची जिल्हाधिका-यांकडे मागणी करण्यात येत असून तीन महिन्यात काम करण्याचे आदेशही देण्यात आल्याचे पोहेकर यांनी सभागृहात सांगितले.
कोरोनामुळे काम रखडल्याचे कारण यावेळी मनपा अधिका-यांनी दिले.यावर आभा पांडे यांनी करोना तर गेल्या वर्षी मार्च पासून उपराजधानीत आला,त्यापूर्वी देखील नागपूरात कोरोना होता का?अशी विचारणा केली.मनपा प्रशासन नागरिकांच्या भावनांशी जुळलेल्या एवढ्या संवेदनशील विषयावर सभागृहाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप आभा पांडे यांनी केला.
यावर अधिका-यांनी सुरवातीला निश्चित केलेली जागा योग्य नव्हती,अशी सावरासावर केली.यावर आभा पांडे यांनी प्रश्न उपस्थित करीत जागेचीच निवड झाली नाही तर पीएमसीने प्रस्ताव कसा तयार केला?असा प्रश्न उपस्थित करुन प्रशासनाला कोंडित पकडले.
अधीक्ष् क अभियंता यांनी त्या ठिकाणी असलेले दोन शेड काढल्यानंतर जागा होईल,शासनाकडून शिल्लक निधी मिळणार असल्याचे सांगून येत्या ३ महिन्यात काम पूर्ण होईल,असे स्पष्ट केले.
यावर आभा पांडे यांनी ३ महिन्यात काम पूर्ण न झाल्यास जनतेच्या या जिव्हाळ्याचा प्रश्नावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
महापौर यांनी देखील साढे चार वर्षांपासून काम रखडणे ही गंभीर बाब असल्याची कानउघाडणी केली.जागाच नव्हती तर प्रस्ताव कसा तयार केला?ज्यांनी हा प्रस्ताव तयार केला त्या अधिका-याला कारणे दाखवा नोटीस बजावून त्याची बाजू ऐकून घ्यावी व त्यात चूक आढळेल तर त्यांच्यावर तसेच कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आदेशत महापौरांनी मनपा आयुक्तांना दिले.




आमचे चॅनल subscribe करा
