

नागपूर: विदर्भ विकास मंडळ नको, वेगळे राज्य द्या, अशी मागणी करत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी लॉकडाउनमुळे घरीच आंदोलन करून विदर्भाचा मुद्दा नव्याने रेटला. युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासुरकर यांच्या नेतृत्वाखाली शहीद चौकातील विदर्भ चंडिकेसमोर निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत छोटेखानी सभा घेण्यात आली. तसेच, वेगळ्या राज्याची मागणी करणारे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व केंद्रीय गृहमंत्र्यांना मेलद्वारे पाठवले.
वैधानिक मंडळांची स्थापना होऊन २५ वर्षे झाली. मात्र, अनेक प्रकल्प आजही अपूर्ण आहेत. वनसंपदा वैदर्भीयांनी जोपासली. यावर मिळणारे अनुदान पश्चिम महाराष्ट्राने लाटले. वैदर्भीय तरुणांच्या हक्काच्या नोकऱ्यादेखील दिल्या नाही. मंडळाला मुदतवाढ देण्याने काहीच फायदा होणार नाही. मंडळ बरखास्त करून विदर्भ राज्याची घोषणा करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
मंडळाची स्थापना करण्यास ३८ वर्षे लागली. यानंतरही विदर्भाचा विकास झाला नाही. सरकारने निधी दिला नाही व राज्यपालांच्या निर्देशांचे पालनही केले नाही. त्यामुळे विकास तर दूर उलट अनुशेषात वाढ झाली. मंडळाला मुदतवाढीची मागणी करण्यात येत आहे. सरकारने मंडळ न देता वेगळे राज्य करावे, यासाठी कार्यकर्त्यांनी घरीच आंदोलन केले. यापुढेही आमचा लढा चालूच राहील, असे समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या छोटेखानी सभेत मुकेश मासुरकर, सुयोग निलदावार, गणेश शर्मा, अनिलकुमार केसरवानी, राजेश बंडे, व्यापारी आघाडीचे रवींद्र भामोडे, घनश्याम पुरोहित आदी भाषणे झाली. आंदोलनात विजय मौंदेकर, नंदकिशोर पेरकर, जितेंद्र बडवे, विनोद कावळकर, ज्ञानेश्वर पराते सहभागी झाले होते.




आमचे चॅनल subscribe करा
