

डॉ. मायी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘मायी मेमोअर’ पुस्तकाचे प्रकाशन
नागपूर, १८ जुलै: सरकारी संस्थांमध्ये सुरू असलेले संशोधन कार्य फारसे परिणामकारक नाही. पण डॉ. सी. डी. मायी यांनी खासगीरित्या केलेल्या संशोधनाने कृषी क्षेत्रात क्रांती झाली. आता त्यांनी बीज उत्पादकता वाढवण्याच्या ‘मिशन’ वर काम करावे, असे आवाहन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर (एसएबीसी), मायी कुटुंबिय व अॅग्रोव्हिजन फाउंडेशनच्या संयुक्त वतीने शनिवारी कृषीतज्ज्ञ डॉ. सी. डी. मायी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सेंटर पॉइंट येथे झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, जितेंद्रनाथ महाराज, डॉ. सी. डी. मायी, अॅग्रोव्हीजन फाउंडेशनचे संचालक रवी बोरटकर व एसएबीसी नवी दिल्लीचे भागीरथ चौधरी यांची उपस्थिती होती. जितेंद्र महाराज व नितीन गडकरी यांच्या हस्ते डॉ. सी. डी. मायी यांचा पत्नी हेमा मायी यांच्यासह शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते डॉ. मायी यांच्या जीवनावर आधारित ‘मायी मेमोअर’ या पुस्तकाच्या इंग्रजी व मराठी आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी नितीन गडकरी यांनी डॉ. मायी यांच्याशी संबंधित जुन्यात आठवणींना उजाळा दिला. अॅग्रोव्हिजनमधील त्यांच्या कामाचे कौतूक करताना गडकरी म्हणाले, भारतीय कृषी क्षेत्रात खूप समस्याअ असून खते, किटकनाशकांचे दर प्रचंड वाढले आहेत. तुलनेत पिकांना भाव मिळत नसून उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सिंचन, पाणी व्यवस्थापनासोबतच कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संशोधन होणे आवश्यक असून त्याकरिता विद्यापीठे, संशोधन संस्था, संशोधकांना स्वातंत्र्य देण्याची आज खरी गरज आहे. डॉ. मायीसारख्या शास्त्रज्ञांनी त्याकरिता पुढे यावे, असे गडकरी म्हणाले.
जितेंद्रनाथ महाराजांनी डॉ. मायी यांना दीर्घायुष्या्साठी आशीर्वाद दिले. डॉ. मायी हे कृषी क्षेत्रातील ‘फरिश्ते ’ आणि ‘स्कूल ऑफ थॉट’ आहेत असे ते म्हणाले.
माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी आपल्या व्हर्च्युअल संदेशात डॉ. मायी यांनी कृषी क्षेत्रातील नवीन पिढीला प्रोत्साहित करण्याचे महत्वाचे कार्य केल्याचे सांगितले.
सत्काराला उत्तर देताना डॉ. मायी यांनी शेतक-यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी त्यांच्याबरोबर काम करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
एसएबीसी नवी दिल्लीचे भागीरथ चौधरी यांनी प्रास्ताविकातून ‘मायी ममोअर’ पुस्तकाबद्दल माहिती दिली. डॉ. मायी यांच्या आठवणी आणि अनुभवांचा संग्रह असलेल्या या पुस्तकाचे लेखन दिल्लीच्या निलिमा पाठक यांनी तर मराठी अनुवाद नागपूरच्या मंजुषा जोशी यांनी केला असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक्षा मायी यांनी केले तर रवी बोरटकर यांनी आभार मानले.ते यावेळी म्हणाले, डॉ. मायी हे मागील १५ वर्षांपासून ऍग्रोव्हीजनशी सल्लागार या नात्याने जोडले गेले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली फाऊंडेशन उत्तरोत्तर प्रगती करत आहे.
राधा सावदेकर, तनुश्री सावदेकर, इदांत मायी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.




आमचे चॅनल subscribe करा
