

‘अक्षयदान’ उपक्रमाचा चौथा दिवस
नागपूर,ता.१७ मे: भूतकाळाचा वेध घेऊन, वर्तमानात आनंदी जीवन जगण्याचे सूत्र सांगणा-या आणि भविष्य उज्ज्वल करणा-या पुर्वजन्म, पुनर्जन्माची संकल्पना प्राचीन साहित्यामध्ये महर्षि पतंजली, गौतम बुद्ध, भगवान महावीर यांनी मांडल्या आहे. इतर देशांमध्ये यावर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू असून आपल्या देशातही त्यासंदर्भात अभ्यास होणे गरजेचे आहे, असे मत अभ्यासक डॉ. सुनीता जोशी यांनी सांगितले.
पत्रभेटच्यावतीने आयोजित अक्षयदान या उपक्रमाच्या चौथ्या दिवशी ‘पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी’ या विषयावर नागपूरच्या डॉ. सुनीता जोशी यांनी भाष्य केले.कार्यक्रमाला प. पू. सद्गुरूदास महाराजांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सुनीता जोशी म्हणाल्या, मनुष्यदेह जीर्ण झाल्यानंतर आत्मा शरीर सोडून नवीन देह धारण करतो आणि परत कार्यरत होतो. कितीतरी हजारो वर्षांपासून हे सुरू आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण, घटना या आपल्या पुर्वजन्मावर आधारित असते. प्रत्येक जन्मातील क्षणाक्षणाच्या स्मृती आपल्या स्मृती पटलात साठवल्या जातात. आपण कुणाला त्रास दिला, आयुष्यात कोणत्या घटना घडल्या याच्याही स्मृती त्यात असतात. त्यानुसार वर्तमान आयुष्यात त्रास होत असतो. या त्रासातून मुक्त व्हायचे असेल तर पूर्वजन्म प्रतिगमन थेरपी करावी लागते. या थेरपीच्या माध्यमातून आपण पुर्वजन्मात डोकावून पाहू शकतो आणि त्यानुसार आपल्या त्रासावर उपचार करू शकतो.
त्याकरिता ध्यानधारणा करावी लागते. प्रत्येक क्षणाचे सुखदु:ख समान पातळीवर आणावे लागते, मेंदूला ज्यावेळी विचाररहीत अवस्था प्राप्त होते तेव्हा स्मृती पटलातील हे संचित कमी होत जाते आणि पुर्वजन्माचे त्रास, आठवणी कमी होत जातात. पुर्वजन्माच्या कृत्यांचा देवापाशी बसून पश्चाताप केल्यास, जीवनात सुख यायला सुरूवात होते, असे त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन शारदा राजळे यांनी केले.
…..
आज १८ मे रोजी ‘अक्षयदान’ मध्ये सायंकाळी ७ वाजता प्रा. मालेगावचे प्रा. अशोक पोफळे ‘हस्तरेषा शात्र, एक परिपूर्ण शास्त्र’ विषयावर भाष्य करतील.




आमचे चॅनल subscribe करा
