राहूल गांधी यांच्या आरोपांचे परिणाम,देशात मदारयाद्यांचे विशेष सखोल पुनरावलोकन करण्याच्या निवडणूक आयोगाच्या घोषणेमुळे आधीच वादाच्या भोव-या सापडलेल्या, बिहार निवडणूकीतील मतदानावर तर होणारच आहे मात्र,त्यासोबतच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत देखील राहूल गांधींचे आरोप ‘अस्पर्श’राहणार नाही,हे मात्र निश्चित.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची प्रक्रिया प्रभाग रचनेवर आधारित असते.एका प्रभागात तीन ते चार वार्डाचा समावेश होत असल्याने ईव्हीएमला व्हीव्हीपॅट जोडणे शक्य होणार नसल्याचा ‘अतार्किक तर्क’ निवडणूक आयोगाने दिला आहे.मूळात मतदान व मतमोजणीत पारदर्शिता आणण्यासाठीच ईव्हीएमला व्हीव्हीपॅट जोडण्याचा निकाल देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला असताना,सर्वोच्च न्यायालयाची संमती न घेता या निर्णयाला निवडणूक आयोग परस्पर बगल देऊ पाहत आहे.याशिवाय हा आरोप राहूल गांधीनी सात दिवसांच्या आत ‘प्रतिज्ञापत्रावर’करावा अशी मागणी आयोगाने केली.
८ ऑगस्ट २०२५ रोजी राहूल गांधीनी मतदान प्रक्रियेतील गैरप्रकारांबाबत गंभीर आरोप केले होते.काल पुन्हा एकदा त्यांनी गैरप्रकाराच्या पुराव्यानिशी ‘हायड्रोजन’बॉम्ब फोडला.राहूल गांधींच्या मते चार ते पाच प्रकारांनी निवडणूकीत चोरी झाली आहे.एकाच मतदार संघात एक लाखाहून अधिक बोगस मतदार आढळले.एकाच मतदाराचे नाव अनेक राज्यातील मतदारसंघात आढळले.अनेक पत्ते बनावट असून एकाच पत्त्यांवर लाखो मतदारांची नोंदणी करण्यात आली.एकाच खोलीत ,एकाच घरात ८० ते २५० मतदारांची नोंदणी झाली तर ८०-८० वर्षे वयाच्या मतदारांची नोंदणी फॉम-६ नुसार (पहील्यांदा मतदान करणारे)करण्यात आली!कालच्या पत्रकार परिषदेत राहूल गांधी यांनी हरियाणात २५ लाख मतांची चोरी झाली असल्याचा खळबळजनक आरोप पुराव्यांनिशी केला. ब्राझिलच्या महिला मॉडेलच्या छायाचित्राचा उपयोग करुन २२ वेळा मतदान झाल्याचे त्यांनी मोठ्या एलईडी स्क्रीनवर दाखवले.दहा मतदान बूथवर सीमा,स्विटी,सरस्वती,रश्मी यासारख्या नावाने मतदार नोंदणी झाल्याने ब्राझीलच्या या महिला मॉडेलचे मतदान देखील झाले!.याच प्रकारे १ लाख २४ हजार १७७ मतदारांचे बनावट छायाचित्रे वापरुन एकूण ५ लाख २१ हजार ६१९ मतांची चोरी झाली.इतकं करुनही हरियाणात काँग्रेस मात्र २२ हजार मतांच्या फरकाने हरली.हरियाणात खोटे पत्ते दाखवून ९३ हजार १७४ मतांची चोरी झाली.तब्बल ९३ हजारांहून अधिक मतदारांना शून्य घर क्रमांक देण्यात आले,यामुळे पडताळणी होऊ शकली नाही.आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी शून्य घर क्रमांक हा बेघरांसाठी देत या माध्यमातून चोरी लपविण्याचा प्रयत्न केला,असे शरसंधान साधले.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी राहूल गांधी यांचा हा हायड्रोजन बॉम्ब नसून फूसकी लवंगी असल्याची शेलकी टिका केली.
या आरोपांचे खंडन करीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी अनेक मतदारांची नावे दुबार आली होती तर त्याचवेळी काँग्रेसच्या बूथस्तरीय एजंटांनी(बीएलए)दावे आणि आक्षेप का नाही नोंदवले?असा बचाव केला.मतदारयाद्यांतील त्रुटीविरोधात अपील का नाही केले?जिल्हाधिका-यांकडेही काँग्रेस पक्षाकडू कोणत्याही तक्रारी आल्या नाहीत,असे हरियाणाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडून सांगण्यात आले.मूळात इतक्या गंभीर आरोपांनंतरही निवडणूक आयोगाचा अर्विभाव हा राजकीय पक्षाला शोभेल,असा दिसून पडतो.घटनात्मक स्वायत्त यंत्रणेला हे खचितच शोभणारे नाही.मतदान केंद्रांवरील सीसीटीव्ही फूटेज नष्ट करण्याचा आयोगाचा निर्णयही याच अपारदर्शक कारभाराचे निर्दशक आहे.विश्वासहर्ता जपण्यासाठी आयोगाने पुढे येऊन राहूल गांधी यांच्या आरोपांचा तपास करावा व तथ्य देशाच्या नागरिकांसमोर ठेवणे क्रमप्राप्त आहे.देशाच्या लोकशाहीचा डोलाराच ज्यावर उभा आहे,त्या निवडणुकीच्या पारदर्शकतेबाबत वारंवार प्रश्नचिन्हे उपस्थित होणे देशाला परवडणारे नाही.सर्वच राजकीय पक्षांनी नेपाळ,श्रीलंकासारख्या देशात झालेल्या राजकीय उठावातून बोध घेण्याची खरी गरज निर्माण झाली आहे.राहूल गांधीच्या आरोपांना वारंवार ‘फूसका बॉम्ब’ठरवून आपल्यावर दाटलेले संशयाचे धुके बाजूला सारण्याचा ‘केविलवाणा’प्रयत्न करु नये.
ज्ञानेशकुमार यांनी तर राहूल गांधी यांच्या ‘जागरुक मतदार यात्रे‘नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘ना पक्ष ना विपक्ष सारेच समकक्ष’हे उसणे अवसान आणून महत्वाच्या प्रश्नांना वारंवार बगल दिली.त्यांना विरोधी पक्षांविषयीचा मनातील आकस लपविता देखील आला नाही.राहूल गांधी यांनी महादेवपुरा विधानसभा मतदारसंघातील मतदारयाद्यांच्या घोळाबाबत पुरावे दिले,यासंबंधी दम देणा-या इशा-यांशिवाय ज्ञानेशकुमार यांच्या पत्रकार परिषदेतून काहीही निष्पन्न झाले नाही.आपले खोटे कथन सिद्ध करण्यासाठी ‘मतचोरी‘सारख्या गलिच्छ शब्दांचा वापर करु नका,अशा शब्दात त्यांनी राहूल गांधींना समज दिली…! या ऐवजी केंद्रातील मोदी सरकार व सर्वोच्च न्यायालय पाठीशी असताना निवडणूक आयोगाने आपल्या निष्पक्षतेची ग्वाही देण्यासाठी आपली भूमिका विस्ताराने स्पष्ट करुन शंकांचे जाळे कायमचे दूर करने गरजेचे होते.
राहूल गांधी यांनी कर्नाटकातील आळंद आणि महाराष्ट्रातील राजुरा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांची नावे वगळण्यासाठी तसेच समाविष्ट करण्यासाठी राज्याबाहेरील मोबाईल क्रमांक वापरुन इलेक्ट्रॉनिक पद्धतीन फॉर्म ‘अपलोड’करण्यात आल्याचे गंभीर आरोप केले.फॉर्म-६ आणि फॉर्म-७(मतदार यादीत नावे समाविष्ट करणे व गाळणे)‘बीएलओ’ला द्यायचा व त्यावर मतदारनोंदणी अधिका-याने योग्य ती पुढील कारवाई करायची एक पद्धत आहे.दुसरी पद्धत ‘ॲप’च्या माध्यमातून फॉर्म अपलोड करण्याची आहे.राहूल गांधींच्या मते कॉल सेंटर व सॉफ्टवेअरच्या माध्यमातून प्रचंड साधनसामग्री वापरुन डिजिटल तंत्रज्ञानाने मोठ्या प्रमाणात केंद्रीकृत आणि संघटित पद्धतीने काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांचे समर्थक,ओबीसी,दलित,आदिवासी आणि अल्पसंख्यांक मतांची चोरी झाली.त्याची माहिती असलेले ज्ञानेशकुमार अशा मतचोरीमध्ये गुंतलेल्यांचे रक्षण करीत आहे,असा आरोप केला तर कोणत्याही मतदाराचे नाव ऑनलाईन हटवले जात नसल्याचे सांगून आयोगाने हात झटकले.
ज्या आळंद विधानसभा मतदारसंघात दहापैकी आठ मतदानकेंद्रावर लोकसभेत काँग्रेसला भरघोस मते मिळाली होती त्या मतदारसंघात विधानसभा निवडणूकीच्या वेळी ६ हजार ०१८ मतदारांची नावे वगळण्यात आली.परिणामी, आळंद मतदारसंघाच्या मतदारयाद्यांमध्ये ही ६ हजार ०१८ नावे कधीच समाविष्ट नव्हती किंवा ती जशीच्या तशी शाबूत आहेत किंवा ती नावे कोणाच्या शिफारशीने,कशाच्या आधारावर आणि कोणत्या अधिका-याने वगळली याचे संगणकीय पुरावे देऊन स्पष्टीकरण देणे ही ज्ञानेशकुमार यांचीच संवैधानिक जबाबदारी होती. यातून निर्माण झालेले संशयाचे धुके पांगले असते मात्र,असे घडले नाही.परिणामी,कर्नाटकातील काँग्रेस सरकारने सीआयडीकडे चौकशीसाठी हे प्रकरण सोपवले असून सीआयडीने निवडणूक आयोगाला १८ वेळा स्मरण पत्रे पाठवून तसेच कर्नाटक निवडणूक आयाेगाच्या मुख्य कार्यकारी अधिका-याला देखील वारंवार पत्र पाठवून देखील आयोगाने कोणतेही उत्तर दिले नाही…!
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्याच्या राजूरा मतदारसंघात असेच बोगस पद्धतीने ६ हजार ८५० मते मतदारयाद्यांमध्ये जोडण्यात आल्याचा आरोप राहूल गांधींनी केला.हा देखील मुद्दा निवडणूक आयोागाने संवैधानिकरित्या तडीस नेला नाही.ज्ञानेशकुमारांनी घटनात्मक जबाबदारी पार पाडली नसल्याचा आरोप यावरुन विरोधकांनी केला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काँग्रेस आता अती डाव्या विचारांकडे झुकली असल्याची प्रखर टिका केली.देशातील मुख्य विरोधी पक्ष असताना देखील ते सरकारच्या धोरणांना विरोध करण्यापेक्षा ते कायम संवैधानिक संस्थांवर हल्ला करतात,यामुळे भावी पिढीत आपल्या संस्थांविषयी नकारात्मकता पसरल्यास हा देशातील लोकशाहीसाठी मोठा धोका असल्याची चिंता मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली,तर पराभवातून राहूल शिकलेच नाही,अशी टिका केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी केली.
(वाचा भाग -४ मुख्यमंत्र्यांसह विजयाला मिळालेले न्यायालयीन आव्हान)
………………………….
तळटीप:-
भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात लोकशाही टिकवण्यासाठी कायदे मंडळ,कार्यकारी मंडळ,न्याय मंडळ व प्रसार-प्रचार माध्यमे,चारही स्तंभाचे महत्व असून घटनेचे संरक्षण करणे व घटनेचा अन्वार्थ लावणे ही महत्वपूर्ण जबाबदारी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाची आहे.निष्पक्ष न्याय देणे व सत्ताधा-यांच्या कोणत्याही दबाबाला बळी न पडता आपला बाणा टिकवणे,प्रतिमा सांभाळणे ही जबाबदारी न्यायाधीशांची असते.याविषयाची चर्चा पुन्हा सुरु झाली ती सर्वोच्च न्यायालयाने विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांच्यावर केलेल्या अनावश्यक टिपण्णीतून.‘भारत जोडो‘यात्रे दरम्यान राहूल गांधींनी केलेल्या काही वादग्रस्त विधानांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.भारत व चीन यांच्यात झालेल्या संघर्षाच्या काळात चीनने भारताची दोन हजार किलोमीटरची जमीन बळकावली,असे विधान राहूल गांधीनी केले होते.राहूल गांधीची ही टिका वास्तवाला धरुन आहे की ऐकीव माहितीवर या तपशीलात न जाता ‘राहूल गांधी हे जर सच्चे भारतीय असतील तर त्यांनी असे बोलता कामा नये’अशी टिपण्णी न्यायाधीशांनी केली.यातून राहूल गांधी यांच्या भारतीयत्वावरच प्रश्नचिन्ह लावण्याचे काम न्यायालयायने केले,याचा विरोध काँग्रेसने केला हे अपेक्षीतच होते.
महाराष्ट्रात तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर एकेकाळी भाजपच्या प्रवक्त्या पदावर राहीलेल्या आरती साठे यांची शिफारस करण्यात आली.ही नियुक्ती कॉलेजियममार्फत झाली असून ही नियुक्ती कायद्याचा भंग नसली, तरी न्यायव्यथेच्या निष्पक्षतेला नख लावण्याचे काम करीत असल्याची प्रचंड टिका यानंतर झाली.
……………………………………..