
अफवा पसरविणाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार
नागपूर, ता. ३० : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागपुरात अग्निशमन गाड्यांद्वारे आणि स्वच्छतादूतांद्वारे आवश्यक त्या भागात निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्याचा निर्णय मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला. मात्र, काही लोकांनी केवळ पाणी फवारले जात असल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा प्रयत्न केला. कोरोनाशी लढण्यासाठी नागपूर महानगरपालिका प्रामाणिक प्रयत्न करीत असून अफवा पसरविणाऱ्यांविरोधात पोलिस तक्रार करण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली.
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निर्णय घेतल्यानंतर मनपाअंतर्गत असलेल्या शहरातील दहाही झोनमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. यामध्ये सोडियम हायपोक्लोराईडचा वापर करण्यात येत आहे. मात्र, जरीपटका भागातील काही लोकांनी या फवारणीचा व्हिडिओ तयार करून निर्जंतुकीकरणाच्या नावावर निव्वळ पाण्याची फवारणी होत असल्याचा आरोप केला आहे. तसा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये टाकून समाजामध्ये भीती पसरविण्याचे कार्य काही लोकांच्या माध्यमातून होत आहे. मात्र, कोरानापासून नागपुरातील लोकांचा बचाव व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासन आणि नागपूर महानगरपालिका प्रामाणिक प्रयत्न करीत असून हॅण्ड स्प्रे द्वारे सुद्धा सोडियम हायपोक्लोराईडचीच फवारणी होत आहे.
मात्र जे लोक त्यातून केवळ पाणी फवारल्या जात आहे अशी अफवा पसरवित आहे, त्यांच्याविरुद्ध पोलिस तक्रार देण्यात आली असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे डॉ. प्रदीप दासरवार यांनी सांगितले.

निर्जंतुकरणासंदर्भातील आरोप राजकीय हेतूने प्रेरीत : विक्की कुकरेजा
कोरोना हे देशावर आलेले संकट आहे. केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक प्रशासन एकत्र येऊन याविरोधात लढा देत आहे. लोकही शासनाच्या निर्देशाला प्रतिसाद देऊन या लढाईत सहभागी झाले आहे. नागपूर महानगरपालिका नागरिकांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून प्रामाणिक प्रयत्न करीत असताना काही विघ्नसंतोषी लोकं मनपाच्या हेतूवर शंका उपस्थित करून बदनामी करीत आहे. हे सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचे मनपाचे आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, ही वेळ राजकारण करण्याची नाही, हे या लोकांनी ध्यानात घ्यायला हवे. तरीही ते मानत नसेल तर त्यांच्यावर पोलिस प्रशासनाच्या माध्यमातू कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिला आहे. ते म्हणाले, पाण्यामध्ये सोडियम हायपोक्लोराइड मिश्रण करण्यात आले आहे म्हणून ते पाण्यासारखे दिसते. मनपा नियमानुसार कार्य करत आहे. त्यामुळे कोणी मनपाच्या हेतूवर शंका घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.




आमचे चॅनल subscribe करा
