

नागपूर: . यंदा ख-या अर्थाने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नागपूरकरांना खरा उन्हाळा जाणवू लागला आहे.दिवसभर उष्ण वारे वाहतात तर रात्री देखील उष्णता जाणवू लागली आहे. नागपूर आज देशातील तिसऱ्या तर जगातील आठव्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले. नागपुरात शनिवारी यंदाच्या मोसमातील सर्वाधिक ४६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
हवामान खात्याने विदर्भात उष्णतेच्या सौम्य लाटेचा इशारा दिला होता. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून शहरातील तसेच विदर्भ विभागातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. शनिवारी नागपूर खालोखाल अकोल्यात ४६ तसेच चंद्रपूर आणि अमरावती येथे प्रत्येकी ४५.६ अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. आज विदर्भातील सहा जिल्ह्यांमधील तापमान ४५ अंशांहून अधिक होते. विदर्भात अकोला आणि अमरावती येथे पुढील चार दिवस तर नागपुरात पुढील तीन उष्णतेच्या मध्यम स्वरूपाच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत शहरातील तापमान ४६ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
शनिवारी देशात पिलानी येथे सर्वाधिक ४६. ७, त्या खालोखाल चुरू येथे ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. हवामान शास्त्राशी निगडीत असलेल्या एल्डोरॅडो या प्रसिद्ध संकेतस्थळानुसार शनिवारी नागपूर जगातील आठव्या क्रमांकाचे उष्ण शहर होते. या संकेतस्थळानुसार सेनेगल या देशातील मताम (४८.२ अंश) हे जगातील सर्वाधिक उष्ण शहर होते. तसेच जगातील पहिल्या १० उष्ण शहरांमध्ये देशातील पिलानी, चुरू आणि नागपूर या तीन शहरांचा समावेश होता.




आमचे चॅनल subscribe करा
