
पत्रकार परिषदेत डॉ.देवपुजारी यांची माहिती
‘नेल्सन’ हॉस्पीटलचे डॉ.यश बानाईत,डॉ.राशी गुप्ता,डॉ. सुचिता खडसे यांचे विशेष योगदान
नागपूर,ता. ११ मे २०२४: नागपूरात नवजात बालकांना जीवनदान देणारे अद्यावत यंत्र विकसित केल्याची माहिती उपराजधानीतील ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. सतीश देवपुजारी यांनी आज टिळक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.संपूर्ण देशी साहित्यातून नवजात बालकांचे आपातकाल परिस्थितीत प्राण वाचवणारे प्राणवायू दाब यंत्र विकसीत केल्याचा दावा डॉ. देवपुजारी यांनी केला.
याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले,की बाळाचा जन्म झाल्यावर तीन मिनटांच्या आत तो रडायला हवा. बाळाच्या रडण्यातून त्याला प्राणवायूचा पुरवठा होत असल्याचे संकेत मिळतात. बालकांना तीन मिनटांत आवश्यक प्राणवायू न मिळाल्यास त्यांच्या मेंदूलाही इजा होऊ शकते. बालरोग तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार जन्म घेणा-या प्रत्येक १०० बालकांपैकी चार ते पाच बालकांना जन्मजात श्वास घ्यायला त्रास होतो. त्यामुळे या बालकांना योग्य नियंत्रणातून प्राणवायू देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
गरजेहून जास्त प्राणवायू दिल्यास बालकाला अंधत्व येऊ शकते. दरम्यान, विदेशात सध्या या पद्धतीचे यंत्र फार महागडे आहे. त्यामुळे नागपुरात संपूर्ण देशी साहित्यातून हे यंत्र विकसीत करण्यात आले असल्याचे ते म्हणाले. या यंत्राच्या स्वामित्व हक्कासाठी अर्जही केला असल्याची माहिती त्यांनी दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’या संकल्पनेतील हे एक महत्वाचे पाऊल असल्याचे डॉ.देवपुजारी यांनी सांगितले.
हे यंत्र महाराष्ट्रासह भारतात बालमृत्यू कमी करण्यास सहाय्यक ठरू शकते. नेल्सन रुग्णालयात १२ मे रोजी आयोजित परिषदेत या यंत्राचा नमुना सादर करणार असल्याचेही डॉ. देवपुजारी यांनी सांगितले. या यंत्राच्या निर्मितीत डॉ.यश बानाईत,डॉ.राशी गुप्ता,डॉ. सुचिता खडसे यांचे विशेष योगदान असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी बोलताना डॉ.यश बानाईत यांनी सांगितले,की भारतामध्ये बालमृत्यू दर हा सर्वाधिक आहे.बालमृत्यू दर आटोक्यात आणण्यासाठी आपल्याकडे अद्यावत तंत्रज्ञान उपलब्ध देखील आहे.वैद्यकीय संशोधनाच्या क्षेत्रात अंधपणे फक्त पाश्तात्य तंत्रज्ञान किवा संशोधनावर निर्भर राहणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.यात योग्य तंत्रज्ञान हे महत्वाचे आहे.जगातील कोणत्याही स्त्रीला मातृत्सव तेव्हाच मिळत असतं जेव्हा जगात आल्या बरोबर तिचे बाळ रडत असतो.त्यामुळे बाळाच्या अगदी पहील्या रडण्याला वैद्यकीय आणि भावनिकदृष्टया खूप जास्त महत्व आहे.याच पार्श्वभूमीवर आम्ही संशाेधन केले असून या अद्यावत यंत्राची निर्मिती केली असल्याचे त्यांनी सांगितले.नवजात बालकाला कोणतीही गोष्ट जास्त दिल्यास त्याचे दुष्परिणाम बालकाच्या शरीरावर होत असतात.भारतात असा स्वरुपाचे यंत्र जरी बनविण्यात आले असले तरी नागपूरात नवजात बालकांचे प्राण वाचवणारे हे पहिले यंत्र आहे.
डॉ.राशी गुप्ता यांनी सांगितले की,या यंत्राची किंमत अतिशय अल्प असून पूर्णत:पारदर्शिपणे याची निर्मिती करण्यात आली आहे. हाताळण्यासाठी देखील अगदी सोपे आहे.या यंत्राचे महत्व विशद करतानाच,ग्रामीण भागात अद्यापही बालमृत्यू दर हे शंभर बालकांमागे १४ ते १५ असून केरळामध्ये हा दर ७ एवढा आहे.ग्रामीण भागात बालमृत्यू दर थांबविण्यासाठी या यंत्राची अत्यंत महत्वाची मदत सरकराला होणार असून आम्ही याचे प्रशिक्षण देखील देण्यास तयार आहोत.सरकारने पुढाकार घेऊन या यंत्राचे सहाय्य बालमृत्यू थांबवण्यासाठी घ्यावे,असे आवाहन त्यांनी केले.
पत्रपरिषदेला डॉ. यश बनाईत, डॉ. राशी गुप्ता, डॉ. सुचिता खडसे उपस्थित होते.




आमचे चॅनल subscribe करा
