

प्रेक्षकांच्या मनावर चित्रपटाचं गारुड:गानसुरांच्या सम्राज्ञाचे उलगडले जीवनपट
नागपूर,ता.१६ एप्रिल २०२२: नाट्यक्षेत्रात मोलाचे योगदान देणारे हिंदुस्थानी शास्त्रीय गायक वसंतराव देशपांडे यांचा जन्म २ मे १९२० रोजी मुर्तिजापूर येथे झाला होता.या महान गायकाचे वैशिष्ठ म्हणजे फक्त शास्त्रीय संगीतच नव्हे तर ख्याल गायकी,नाट्य संगीत,ठूमरी,गजल व टप्पा गायकीत देखील त्यांच्या सुरांना स्वर्गीय विशेष देणगी लाभली होती मात्र आयुष्याच्या पूर्वार्धात पराकोटीचा संघर्ष,अपयश,हताशा याचा सामना केल्यानंतरच ख-या सोन्याप्रमाणे ते तावून-सुलाखून ‘पंडीत वसंतराव देशपांडे या ओळखीपर्यंत येऊन पोहोचू शकले होते.त्यांचा हाच जिवनपट ’मी वसंतराव’च्या रुपाने प्रेक्षकांसमोर आला असून या चित्रपटावर मराठी प्रेक्षकांच्या अक्षरश:उड्या पडत आहे.आज नागपूरातील सुदामा चित्रपटगृहात या चित्रपटाचा यातील कलावंतांसोबत खास निमंत्रितांसाठी विशेष शो चे आयोजन करण्यात आले होते.
चित्रपट सुरु होतो त्यांच्या जन्मापासूनच्या संघर्षापासून.कश्याप्रकारे त्यांची सुरेल गळ्याची देणगी लाभलेली जन्मदात्री आई त्यांना जन्मानंतर मुर्तिजापूर सोडून नागपूरला आपल्या भावाकडे घेऊन येते.कश्याप्रकारे अनेक हाल अपेष्टा सहन करुन एकट्याने त्यांचे संगोपन व शिक्षण करते.हा प्रवास थक्क करणारा आहे.वसंतराव यांच्या आयुष्यात टप्प्याटप्प्याने येणारे गुरु.यात पं.दिनानाथ मंगेशकर,लाहोरचे उस्ताद,पुण्यातील बेगम,लावणी साम्राज्ञी,असे विविध गुरु त्यांच्या गळ्यावर सुरांचे संस्कार घडवतात.वसंतराव यांची लिपिक पदाची नोकरी,तीन मुलांची जवाबदारी,नेफाला झालेली बदली,संसारासाठी नोकरीत होणारी घुसमट,हे सर्व प्रसंग राहूल देशपांडे(वसंतराव देशपांडे यांचा नातू)याने अक्षर:हा पडद्यावर जिवंत केले आहे.
चित्रपटातील सर्वच कलावंतांनी अतिशय ताकदीचा अभिनय केला आहे मात्र वसंतराव यांच्या आईच्या भूमिकेत ‘माझ्या नव-याची बायको’फेम अनिता दाते यांनी प्राण ओतले आहे.टेलिव्हिजनसारख्या छोट्या पडद्यावर प्रभावी कथानक अभावी एवढ्या गुणी अभिनेत्रीच्या अभिनयाला वावच मिळाला नाही मात्र ‘मी वसंतराव’सारख्या चित्रपटात आपल्या कसदार अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांना अचंभित व प्रभावित केले.अगदी पहील्या दृष्यापासून तर शेवटच्या दृष्यापर्यंचा पडदा हा अमिता दाते,राहूल देशपांडे यांच्या बरोबरीने व्यापतात.
या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे चित्रपटातील संवाद जे सरळ प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतात.‘सूर आपले गुलाम असावे लागतात’’एक एक सूर हे आपले दैवत असतात’’शुद्ध सुराचा ‘सा’ लागताच देवासमोर उभे राहायची गरजच नाही देवच आपल्या भेटीला येतो’‘स्वरातील मस्ती वागण्यात उतरली’मला वाटतं वागण्यातली मस्ती स्वरात उतरते’हे संवाद वसंतराव व पं.दिनानाथ मंगेशकर यांच्यातील आहेत.यांच्यातील आणखी एक संवाद म्हणजे ’खरे दारिद्र्य म्हणजे आपल्याला गायचं आहे पण समोरच्यांना ते ऐकायचे नाही’’वेगळी दाद काय असते तर मैफिलीत वन्स मोर तर कुठेही मिळत असतं मात्र मैफिल संपल्यावर जेव्हा श्रोते नि:शब्द होतात,त्यांचा आवाज निघत नाही,टाळ्या पडत नाहीत,विचार करणं ते विसरुन जातात,सर्वत्र शांतता पसरते ती खरी दाद’हे त्या दोघांमधील संवाद प्रेक्षकांच्या कानांसोबतच ह्दयालाही तृप्त करुन जातात.
वसंतराव जेव्हा लाहोरमध्ये गाण्यासाठी गुरु शोधतो ते त्यांना गवसतात आणि या उस्तादाकडून त्यांना गाण्याचा आत्माच गवसतो.सुरवातीला त्यांच्याकडून राग मारवा शिकताना वसंतराव फक्त उस्तादच्या गायकीची हुबेहुब नक्कल करतात मात्र जेव्हा उस्ताद त्यांना सांगतो’एक बाप के ना होने से जिंगगी क्या होती हैे ये सोचके राग मारवा गाआे’हे ऐकताच वसंतरावांना हरवलेला भाव गवसतो.
राग मारवा गाण्यासाठी उस्ताद व वसंतराव हे ना उजेड ना रात्र असा चौथा प्रहर निवडून रियाज करतात.पडद्यावरील ना रात्र ना उजेड याचे अप्रतिम दृष्य आणि गुरु-शिष्यामधील संवाद हे देखील प्रेक्षकांचं मन तृप्त करुन जातं.
सलग सहा महीने वसंतरावांना हे उस्तात राग मारवाच शिकवित असतात,एक दिवस वसंतराव त्यांना दूसरा राग कधी शिकवणार असं धाडसाने विचारतात,उद्यापासून तुला वेगळा राग शिकवतो असे उस्ताद त्यांना सांगतात मात्र तो दुसरा दिवस वसंतरावांच्या जिवनात उजाडतच नाही कारण हिंदू-मुस्लिम दंग्यामध्ये देश होरपळून निघतो आणि मामासोबत लाहोरला गेलेला वसंत हा मामाने जबरीने रेल्वेत बसवून नागपूरला पाठविल्यामुळे जिवंत परत येतात मात्र मामा पुन्हा कधीच परतू शकले नाहीत,हे दृष्य व हा संवाद देखील फाळणीची व्यथा जिवंत करुन जातं.
‘सुरांची दौलत गळ्यामध्ये असताना गळ्याभोवती हार नाही पडले तरी काय फरक पडतो?’‘एका कलाकाराला प्रेमळ माणसांची साथ हवी नाही तर कला रॉकेलसारखी उडून जाईल’यासारखे संवाद देखील चित्रपटाची जान ठरतात.
नागपूरातील बुटी मंदिराचे चित्रिकरण,मूळ नागपूरचे आणखी एक वैभव सुप्रसिद्ध नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे पडद्यावर आगमन होताच नागपूरकर म्हणून ऊर अभिमानाने भरुन येतो.
दारव्हेकरांना ’कट्यार काळजात घुसली’या आपल्या अजरामर संगीत नाटकाचा अंत बदलण्याचा सल्ला देण्याचे धाडस वसंतराव करतात.यासाठी त्यांना नाटकातून काढल्या जातं.ती हताशा राहूल याने पडद्यावर जिवंत केली,प्रेक्षकांना वसंतची हताशा स्वत:ची वाटू लागते.मात्र उम्दा व खरे कलावंत हे आपल्या अहंकारापेक्षा आपल्या कलेवर प्रेम करणारी असतात हेच खरे,दारव्हेकरांनी अखेर वसंतरावाचे ऐकून आपल्या नाटकाचा अंत बदलवला आणि ’खरेच कट्यार काळजात घूसवली’.नाटकाचा हाच अंत या नाट्यकृतिला अजरामर करुन गेला.
वसंतराव यांच्या जिवनात सूरांएवढेच महत्व जर कोणाला असेल तर महाराष्ट्राचे लाडके दैवत पु.ल.देशपांडे यांचे होते.वसंतरावांच्या अनेक मैफिलीत पु.ल.यांनीच संवादिनी वादन केले आहे.वसंतरावांच्या खडतर प्रवासात,त्यांच्या जिवनात संगीत परत यावं यासाठी केलेली धडपड,चित्रपटाच्या रुपाने आपल्यासमोर उलगडते.पडद्यावर पु.ल.यांच्या भूमिकेत पुष्कराज याने जान ओतली.
केवळ नागपूरच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचं वसंतराव देशपांडे नावाचं हे सुरांचं दैवत ३० जुलै १९८३ रोजी पुण्यात अनंताच्या प्रवासाला निघून गेले.
चित्रपटात राहूल देशपांडे,अनिता दाते,कौमुदी वालोकर,पुष्कराज चिरुटकर,दूर्गा जसराज,अमेय वाघ,अरुण नंद,सारंग साठ्ये आदी कलावंतांनी अप्रतिम भूमिका साकारल्या असून चित्रपटाचे निर्माता मंदाल गोखले असून दिग्दर्शन निपूण धर्माधिकारी यांनी केले आहे.




आमचे चॅनल subscribe करा
