

महापौर पदी सहा महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण
शहरासाठी राबवणार अनेक वैविध्यपूर्ण उपक्रम
नागपूर,ता. ७ जुलै: कोणतीही त्रासदी ही व्यक्तिगत नसते ती सामुहिकच असते, कोरोनाची त्रासदी ही अगदी तशीच होती आणि आहे तरी देखील राज्यातील महाविकासआघाडी सरकारने नागपूरचे खासदार व केंद्रिय मंत्री नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष् नेते देवेंद्र फडणवीस यांची कोणतीही मदत मागितली नाही मात्र तरीही व्यक्तिगतस्तरावर या दोन्ही नेत्यांनी नागपूरकरांचा जीव वाचवण्यासाठी युद्धस्तरावर काम केले,राज्य सरकारने तर त्यांचे सहकार्य ही घेतले नाही,हे दोन नेते नसते तर काेरोनाच्या भीषण अश्या दुस-या लाटेत नागपूर शहराची स्थिती ही आणखी भीषण असती असे वक्तव्य महापौर दयाशंकर तिवारी यांनी आज बुधवार दि. ७ जुलै रोजी पत्रकारांशी अनौपचारिक संवादादरम्यान केले.
महापौर दयाशंकर तिवारी यांची ५ जानेवारी २०२१ रोजी महापौरपदी निवड झाली. कोविड नियमावलीमुळे ही निवडणूक ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. ७ जानेवारी २०२१ रोजी दयाशंकर तिवारी यांनी महापौर पदाचा पदभार स्वीकारला होता.
महापौर पदी त्यांच्या कार्यकाळाला ७ जुलै रोजी सहा महिन्यांचा कालावधी लोटल्याने त्यांनी या दरम्यान नागपूर शहरासाठी केलेल्या कार्याची माहिती देण्यासाठी पत्रकारांसोबत या अनौपचारिक वार्तालापाचे आयोजन केले होते.याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की,करोना काळात १ ते १४ एप्रिल २०२१ दरम्यान ते स्वत: देखील करोनाने बाधित झाले होते,तो काळ म्हणजे दररोज शहरात साढे सात हजार बाधितांचा आकडा समाेर येत होता,याच एप्रिल महिन्यात एकाच दिवसात ७ हजार ९९९ संसर्गितांच्या आकड्याने सरासरी गाठली होती,तरी देखील मी दररोज नागपूरकर जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होतो.त्यांच्या संपर्कात होतो,त्यांना मदत करण्याचा प्रयत्न ही केला,यासाठी मला मनपा प्रशासनाचे सहकार्य देखील मिळाले.
१२ एप्रिल नंतर रेमडिसिवीरसाठी शहरात खूप गोंधळ माजला होता,३० मार्च रोजीच मी स्वत: रेमडिसीवीरच्या संदर्भात केंद्रिय आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहले होते.त्यामुळेच तेवढ्याच संवदेनशीलतेने सांगतोय,त्यावेळी गडकरी व फडणवीस नसते तर नागपूर शहराची परिस्थिती आणखी भीषण आणि भयावह झाली असती. मोठी त्रासदी ही व्यक्तिगत कशी?असा प्रश्न करीत त्यावेळीही मी मात्र कोणतेही राजकीय वक्तव्य केले नसल्याचे ते म्हणाले.राज्य सरकारकडून नागपूर मनपाला प्राप्त लसी यांच्या वाया जाण्याचे प्रमाण हे सर्वात कमी असल्याचे त्यांनी सांगितले.लसीकरणासाठी पात्र असणा-या गटात जवळपास ४५ टक्के लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली.
महापौर पदी रुजू झाल्यानंतर शहरासाठी जे अनेक महत्वाकांक्ष्ी प्रकल्प व योजनांची घोषणा केली होती त्या पूर्णत्वास येण्यास ६ महिन्यांचा काळ हा अल्पावधीच असल्याचे ते म्हणाले तसेच त्यावेळी करोनाचा प्रार्दुभाव एवढ्या गतीने जनतेवर आक्रमण करेल याची माहिती नसल्याची स्पोष्टक्ती त्यांनी दिली.
तत्पूर्वी प्रास्ताविकेत बोलताना स्थायी समितीचे अध्यक्ष् अविनाश ठाकरे म्हणाले की महापौरांच्या कार्यकाळाला आज सहा महिने पूर्ण झाले.या दरम्यान त्यांच्या कुठल्या कुठल्या योजना व प्रकल्प पूर्णत्वास आल्या व पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर आहेत त्याची माहिती देण्यासाठी पत्रकारांसोबत या अनौपचारिक चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे.करोनाच्या काळात त्यांनी अवलंबलेली प्रणाली ही अतिशय स्तुत्य आहे. सहा महिन्यांचा कार्यकाळ हा काही खूप मोठा कार्यकाळ नाही पण त्यांच्यासारख्या अनुभवी व्यक्तीने करोनाकाळात नागपूरकर जनतेच्या सुविधेसाठी आपल्या अनुभवाचा खूप चांगला उपयोग केला.आज नागपूर शहरात करोनाबधितांची संख्या एक टक्क्यावर आली आहे.जनकल्याणाची कामे राबविताना निधीची टंचाई भासते तेव्हा त्यांच्या अनुभवी नेतृत्वात सर्व सदस्य काम करत आले.आभार देखील अविनाश ठाकरे यांनीच मानले.
पत्र परिषदेला उपमहापौर मनीषा धावडे, सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, प्रतोद दिव्या धुरडे, माजी स्थायी समिती सभापती विजय (पिन्टु) झलके व माजी सत्तापक्ष नेता संदीप जाधव आदी उपस्थित होते.
महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि त्यांचे कार्य-
ई-कचरा
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून नागपूर शहराचा विकास होत आहे. त्यादृष्टीकोनातून ई-कचऱ्याकडे लक्ष देणेही नितांत गरजेची बाब आहे. संपूर्ण देशात सर्वात जास्त ई-कचरा निर्माण होतो, अशा १० शहरांच्या यादीमध्ये नागपूर शहराचा समावेश आहे. पण ई-कचऱ्याची विल्हेवाट करण्याची व्यवस्था नागपूर शहरात नाही. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून एक वेंडर निर्धारित करुन जर ई-कचरा त्याला विकण्यात आला आणि त्या वेंडरला शासकीय धोरणानुसार व नियमानुसार ई-कचऱ्याची विल्हेवाट करण्याचे काम देण्यात आले. शहरातील ई-कचरा संपेल, सोबतच महानगरपालिकेला या माध्यमातून दरवर्षी ४-५ कोटी रुपये उत्पन्न होणे अपेक्षित आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून ई-कचऱ्याची विल्हेवाट करुन पर्यावरण संरक्षणासोबतच नवीन मार्गातून उत्पन्नाचे साधन उभे करता येईल. रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे बँकेचा ई-कचरा विल्हेवाट करण्याची एक नियमावली रिझर्व बँकेने तयार केलेली आहे. पुढील पाऊल म्हणून महानगरपालिकेने जर तत्सम व्यवस्था उपलब्ध करुन दिली तर त्या माध्यमातून आणखी जास्त उत्पन्न प्राप्त होण्याची संधी उपलब्ध होईल. महानगरपालिकेने यादृष्टीने पाऊल उचलण्यासाठी स्वत: महापौरांनी पुढाकार घेतला. या उत्पन्नाच्या साधनावर तातडीने धोरण तयार करण्यासाठी त्यांनी प्रशासनाला सुचविले. प्रशासनाने तसा प्रस्ताव तयार करून तातडीने तो प्रस्ताव स्थायी समितीसमोर करण्यास त्यांनी सांगितले. त्याचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन : ७५ चौकांचे सौंदर्यीकरण
यावर्षी स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने देशप्रेमाची ज्वाज्वल्य भावना प्रत्येक मनात जागविण्याच्या दृष्टीने महापौर दयाशंकर तिवारी यांनी विविध प्रकल्पांची आणि उपक्रमांची संकल्पना मांडली आहे. त्यातीलच एक म्हणजे नागपूर शहरातील ७५ चौकांचे सौंदर्यीकरण. नागपुरातील सामाजिक संस्थांच्या आर्थिक सहकार्याने हा प्रकल्प पूर्णत्वास जावा, असा संकल्प त्यांनी केला. यासाठी योग्य ती तरतूदही करण्यात आली आहे.
स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना वंदन-
देशाच्या स्वातंत्र्यासाठी पुकारलेल्या स्वातंत्रलढयात अनेक लोकांनी बलिदान दिले आहे. कुटुंबीयांची चिंता न करता अनेकांनी आपले प्राण गमावले आहे. त्यांच्या बलिदानाने कुटुंब पोरके झाले. ज्यांनी स्वातंत्र्याच्या लढयात आपले सर्वस्व अर्पण करुन त्यांनी त्याग, तपस्या व बलिदानाचे उत्तम उदाहरण देशवासियांसमोर ठेवले, ज्यांच्यामुळे स्वातंत्र्याचा सूर्य पाहण्याचे भाग्य या देशातील नागरिकांना लाभले, अशा नागपूर जिल्हाधिकारी यांचेकडे नोंदणी असलेल्या सर्व हयात असलेल्या अथवा मृत पावलेल्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना त्यांच्या कुटुंबात जाऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. देशासाठी कार्य केलेल्या स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांच्या कार्याची नागपूरकरांना नेहमीच स्मरण व्हावे यासाठी एक नामफलक महानगरपालिकेच्या माध्यमातून लावण्याचा निर्णय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने महापौर यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिकेने घेतला आहे.
वंदेमातरम उद्यानाची निर्मिती
नागपूर महानगरपालिका हद्दीतील एम्प्रेस मिल परिसरातील एक लाख चौरस फूट जागेवर ‘वंदेमातरम उद्यान’ निर्माण करण्याचा संकल्प मागील अर्थसंकल्पात तत्कालीन स्थायी समिती अध्यक्षांनी केला होता. त्यास म.न.पा.सभागृहाने मंजुरी प्रदान केली होती. यंदा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाला प्रारंभ होत आहे. त्या अनुषंगाने हा प्रकल्प या वर्षी पूर्ण करण्याचा महापौर दयाशंकर तिवारी यांचा मानस आहे.
वंदेमातरम् हेल्थ पोस्ट
शहरातील बहुतांश वस्त्यांमध्ये आरोग्याच्या किमान प्राथमिक सुविधा असाव्यात हे ध्यान्यात ठेवून महापौर दयाशंकर तिवारी यांनी स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नागपूर शहरात 75 वंदेमातरम् हेल्थ पोस्ट स्वयंसेवी संस्था आणि खासगी हॉस्पीटलच्या सहकार्याने उभारण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने कार्यवाही सुरू झाली. नगरसेवकांच्या आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने जागांची निश्चिती झाली. अनेक स्वयंसेवी संस्थांनी हेल्थ पोस्ट चालविण्याकरिता पुढाकार घेतला, यासाठी महापौरांनी स्वत: अनेक स्वयंसेवी संस्थांशी संपर्क साधून त्यांना यासंदर्भात विनंती केली. कुठलाही प्रकल्प हातात घेतल्यावर त्याचा सातत्याने पाठपुरावा करीत तो तडीस नेणे ह्या स्वभावगुणामुळे जे-जे ठरवले त्या-त्या प्रत्येक प्रकल्पाची कार्यवाही सुरू झाली, हेच महापौर दयाशंकर तिवारी यांचे यश आहे.
ऑक्सिजन झोन
कोरोनाकाळात प्राणवायूचा तुटवडा जाणवला. मात्र कृत्रिम ऑक्सिजनपेक्षा नैसर्गिक ऑक्सिजनचे प्रमाण वाढावे, नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा सकारात्मक परिणाम व्हावा, याकरिता नागपूर शहरात 75 ऑक्सिजन झोन तयार करण्याचा संकल्पही यानिमित्ताने महापौरांनी केला. स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन असल्याने शहराच्या विविध भागातील मोठ्या जागांवर वड, पिंपळ, कदम, कडुनिंब आदी ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांचे रोपण करून असे नैसर्गिक ऑक्सिजन झोन तयार करण्यात येणार आहे. गांधीबाग उद्यानातून या उपक्रमाची सुरुवात झाली. १ जुलै रोजी दक्षिण नागपुरात अनेक कार्यक्रम झाले. भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या पटांगणावर एक हजार वृक्ष लावण्याच्या कार्याचा प्रारंभ झाला. ही संकल्पना नागपुरात भविष्याच्या दृष्टीने चर्चेचा विषय ठरली.
सुपर 75
बिहार येथील श्री. आनंदकुमार यांच्या ‘सुपर ३०’ या संकल्पनेच्या धर्तीवर स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘सुपर 75’ ही संकल्पना नागपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्याचा संकल्प महापौर दयाशंकर तिवारी यांनी केला आहे. याअंतर्गत शहरातील महानगरपालिकेच्या शाळांमधील आठव्या वर्गातील 75 विद्यार्थ्यांची चाचणी परिक्षेद्वारे निवड करण्यात येईल. यापैकी 25 विद्यार्थ्यांना जेईई, 25 विद्यार्थ्यांना पीएमटी आणि 25 विद्यार्थ्यांना एनडीएचे शिक्षण सलग चार वर्षे देण्यात येईल. व्यावसायिकदृष्ट्या प्रशिक्षण देऊन स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण करण्यास निपुण करून चांगल्या ठिकाणी पाठविण्याचा संकल्प नागपूर शहरातील नामवंत शिकवणी वर्गाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच 10 व्या वर्गात हिंदी, मराठी, उर्दु, इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या 100 विद्यार्थ्यांसुद्धा शिकवणी वर्गाच्या माध्यमातून विशेष परिक्षा घेऊन त्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याची सुरुवात शिक्षण विभागाच्या सहकार्याने करण्याचा संकल्पही महापौर दयाशंकर तिवारी यांनी केला आहे. हा अभिनव आणि अनुकरणीय उपक्रम निरंतर सुरू ठेवण्याचा महापालिकेचा मानस आहे.
प्राणवायूची तरतूद
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायूचा प्रचंड तुटवडा जाणवला. भविष्यात कुठलीही परिस्थिती आली तरी असे होऊ नये यासाठी अधिकाधिक ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प नागपूर शहरात उभे राहावे, असे महापौर दयाशंकर तिवारी यांनी सुचविले. त्यापूर्वी सुमारे एक हजार ऑक्सिजन सिलिंडर खरेदी करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूदही केली. पुढील संकट येण्यापूर्वी मनपा प्रशासनाने तातडीने यासंदर्भात निविदा काढण्याचे आदेश त्यांनी दिले. यासाठी अर्थसंकल्पात दोन कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
आरोग्य सेवेला प्राधान्य
कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव बघता तसेच विविध प्रकारच्या संक्रमक रोगाचा प्रादुर्भाव बघता त्याची तपासणी व चिकीत्सा अतिशय माफक दरात किंवा दुर्बल घटक भागात निशु:ल्क करण्याचा मानस महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा देण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून याकरिता लागणारे मनुष्यबळ अर्थात चिकीत्सक, नर्सिंग स्टाफ तसेच चालक व इतर कर्मचारी यांचे नियोजन करावे, असे निर्देश महापौरांनी दिले. आवश्यक भासल्यास म.न.पा.आयुक्तांनी महाराष्ट्र महानगरपालिकेच्या कलम ५३ च्या पोटकलम ३ नुसार याचे योग्य नियोजन करुन नियमाप्रमाणे मानधनावर नियुक्ती करुन आरोग्य सेवेचा लाभ शहरातील नागरिकांना द्यावा, असेही प्रामाणिक मत त्यांनी मांडले.
पंडित दीनदयाल अंत्योदय योजना
समाजातील प्रत्येक घटकांना शासनाच्या योजनांचा लाभ देतानाच महानगरपालिकेच्या माध्यमातूनही त्यांना लाभ मिळावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून महापौर दयाशंकर तिवारी यांचे कार्य सुरू आहे.
दिव्यांग व्यक्तीकरिता राबविण्यात येणा-या कल्याणकारी योजना असुन २१ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या दिव्यांगत्वावर मात करुन त्यांचे आयुष्य स्वावलंबी बनावे, त्यांचे शैक्षणिक उत्थान व्हावे, त्याचे सामाजिक आरोग्य सुदृढ राहावे यासाठी महानगरपालिका त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. नागपूर शहरातील दिव्यांग/अस्थिव्यंग असणाऱ्या नागरिकांना कृत्रिम अवयव लावण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने महापौर दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात प्रथमच पुढाकार घेतला असून पं.दीनदयाल अंत्योदय योजनेअंतर्गत या कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. शहरातील गरजू व वैद्यकीयदृष्ट्या ज्यांना अस्थी अवयव लावण्याची गरज आहे अशा नागरिकांना याचा लाभ देण्याचा महापौरांचा प्रयत्न आहे. याकरिता या अर्थसंकल्पात दोन कोटी प्रस्तावित करण्यात आले आहे. वैद्यकीय विभाग व समाजकल्याण विभाग यांनी याचे योग्य धोरण तयार करण्यासही त्यांनी सांगितले.
योजना-१. कर्णबधीर दिव्यांगांना शस्त्रक्रियेकरिता अर्थसहाय्य योजना : २५ लक्ष रुपये प्रस्तावित.
२ दिव्यांगांना वैयक्तीक स्वयंरोजगारकरिता, दिव्यांग बचत गटांना स्वयंरोजगाराकरीता अर्थसहाय्य योजना : रु. २००.०० लाख प्रस्तावित.
३. मतिमंद घटकातील दिव्यांगांना निर्वाह भत्ता योजना : रु. ५०.०० लक्ष प्रस्तावित.
४ . दिव्यांगांसाठी शिष्यवृत्ती व व्यवसाय प्रशिक्षण अर्थसहाय्य योजना : रु.५०.०० लक्ष प्रस्तावित.
५. दिव्यांगांना सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञान याकरिता अर्थसहाय्य योजना : रु. २००.०० लक्ष प्रस्तावित.
६. प्रधानमंत्री आवास योजना घटक क्र.३ (परवडणारी घरकुले) अंतर्गत नासुप्र, म्हाडा व म.न.पा. तर्फे बांधण्यात येत असलेल्या म.न.पा. हद्दीतील बांधकामाकरिता सोडत पध्दतीने निवड झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना शासन अनुदान रु. २.५० लक्ष सह रु. ५००००/- महानगरपालिकेकडून (आर्थिकदृष्टया दुर्बल) अर्थसहाय्य योजना : रु. १००.०० लक्ष प्रस्तावित.
७. राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या दिव्यांग खेळाडूंना अर्थसहाय्य योजना : रु. १००.०० लक्ष प्रस्तावित.
पद्मभूषण डॉ.विजय भटकर आधुनिक विज्ञान प्रयोग शाळा
विज्ञान डोकेदुखी नसून खेळीमेळीच्या वातावरणात शिकले तर ते आवड बनू शकते ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून नागपुरात अशी आगळीवेगळी आधुनिक प्रयोगशाळा निर्माण करण्याचे स्वप्न महापौर दयाशंकर तिवारी यांनी बघितले आणि त्यादृष्टीने वाटचाल सुरू केली. यासाठी गरोबा मैदान परिसरातील बंद अवस्थेत असलेल्या शाळेची निवड करण्यात आली. या शाळेत पद्मभूषण डॉ. विजय भटकर आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा उभारण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत.
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी ‘अपूर्व विज्ञान मेळावा’ आयोजित करण्यात येतो. यामाध्यमातून तयार झालेले मनपाच्या सुरेंद्रगढ विद्यालयातील दोन विद्यार्थी यांनी छोटे उपग्रह तयार करुन ‘गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नांव नोंदविले. या उपक्रमाने महानगरपालिकेचे विद्यार्थी कुठेही मागे नाही हे सिद्ध होते. स्वाती विनोद मिश्रा व काजल मिश्रा या विद्यार्थ्यांचे महापौरांनी सत्कार करून कौतुक केले. त्यांना प्रोत्साहन दिले. अपूर्व विज्ञान मेळाव्यासोबत जुळलेल्या मनपाच्या दोन शिक्षकांनी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयातील २५० शिक्षकांना प्रशिक्षण देऊन खेळीमेळीच्या वातावरणात विज्ञान शिक्षण समजवून व शिकवून दिले. मनपाच्या शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे हे कार्य एका छताखाली आणून या शहरातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात विज्ञान समजून व शिक्षण देण्याची जबाबदारी महानगरपालिकेव्दारे घेण्यात येईल आणि ह्या जबाबदारीचे पूर्णत: पालन करण्यात येईल, असा विश्वास महसापौर दयाशंकर तिवारी यांनी दिला आहे. या उपक्रमासाठी लागणारा सर्व निधी केंद्रीय मंत्री मा.ना.श्री.नितीनजी गडकरी सी.एस.आर. निधीमधून उपलब्ध करुन देतील, अशी हमीही महापौरांनी दिली आहे.
शहरातील विद्यार्थ्यांना सैनिकी पूर्व प्रशिक्षण-
भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पुन्हा एक महत्त्वकांक्षी प्रकल्प विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्याचा संकल्प महापौर दयाशंकर तिवारी यांनी केला आहे. दोन वर्षी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मनपाने दुर्गानगर विद्यालय परिसरात सैन्य भरतीच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण शिबीर आयोयित केले होते. या शिबिरात प्रशिक्षण घेतलेल्या तीन विद्यार्थिनींची सैन्यामध्ये निवड झाली. मनपाने विद्यार्थ्यांना अशा सोयीसुविधा पुरविल्या तर सैन्यभरतीमध्ये खारीचा वाटा उचलता येईल, हे हेरून महापौर दयाशंकर तिवारी यांनी माजी सैनिक संघटनेच्या सहकार्याने बिजली नगर परिसरातील आर.बी.जी.जी. शाळेच्या पटांगणावर विद्यार्थ्यांना वर्षभर सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण देण्याचा संकल्प केला. त्यादृष्टीने कार्यवाही सुरू झाली आहे.
गणिती उद्यानाची निर्मिती (Mathematical Garden)
गणिती उद्यान ही अभिनव संकल्पना महापौर दयाशंकर तिवारी यांनी मांडली. नागपूर शहरातील मौजा दिघोरी येथील बिरसा नगर या भागात 20 हजार चौरस फूट जागेवर शहरातील सर्व विद्यार्थ्यांकरिता ‘स्केटींग रिंक व गणिती उद्यान’ निर्माण करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. दोन्ही उद्यानासाठी तसेच इतर उद्यानाच्या सुस्थिती, दुरुस्ती प्रवर्तन व निर्माणासाठी बांधील खर्चासहीत या अर्थसंकल्पात रु २४.१० कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
शहर सौंदर्यात भर-
नागपूर शहरातील ऐतिहासिक स्मारक, नामांकित स्थळे, विविध प्रसिध्द चौकात अत्याधुनिक पध्दतीने प्रकाश व्यवस्था करुन नागपूर शहरात येणा-या पर्यटकांना या स्थळांकडे आकृष्ट करण्याच्या दृष्टीने आणि शहराच्या सौंदर्यात भर पडावी यादृष्टीने महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून एक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यादृष्टीने कार्यवाही सुरू आहे.
रेन वॉटर हार्वेस्टिंग
पावसाचे पाणी साठवणे किंवा त्या पाण्याने भूजल स्तर वाढविणे यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अत्यावश्यक आहे. या कार्याला यापुढे प्राधान्य देण्याचा संकल्पच महापौर दयाशंकर तिवारी यांनी केला आहे. याकरिता रु. ३.५० कोटीची तरतुद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
महापौर दृष्टी सुधार योजना
ज्यांना तिरळेपणाची व्याधी आहे, त्या सर्वांनाच नि:शुल्क शस्त्रक्रिया करून त्यातून मुक्त करण्याचा संकल्प महापौर दयाशंकर तिवारी यांनी केला आहे. महापौर दृष्टी सुधार योजनेच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिका व महात्मे नेत्रपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने ही शस्त्रक्रिया करण्यात येईल. यासाठी लागणारा खर्च शासनाच्या विविध योजनांमधून उपलब्ध करून नि:शुल्क शस्त्रक्रिया करण्यात येईल. महापौर दृष्टी सुधार योजना असे या योजनेचे नाव राहील.
महापौर नेत्र ज्योती योजना
नागपूर शहरातील प्रत्येक प्रभागात नेत्र तपासणी शिबिर आयोजित करून मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांवर नि:शुल्क शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प महापौर दयाशंकर तिवारी यांनी केला आहे. नागपूर महानगरपालिका आणि महात्मे नेत्रपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. महापौर नेत्र ज्योती योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे.
महापौर जीवनावश्यक औषधी अधिकोष
गरीब व गरजू व्यक्तींना आवश्यकतेच्या वेळी औषधी उपलब्ध व्हावी यासाठी सामाजिक संस्था, व्यापारी संस्था, औद्योगिक घराणे, व कॉर्पोरेट सेक्टर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर महानगरपालिका महापौर जीवनावश्यक औषधी मेडिकल बँक’ उभारेल असे नियोजन करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत औषधींचे वाटप करण्यासाठी महानगरपालिकेद्वारे निर्धारित समितीच्या माध्यमातून गरीब व गरजू रुग्णांचे निकष ठरवून त्यांना औषधी पुरवठा करण्यात येईल.
महापौर वैद्यकीय साधन सामुग्री अधिकोष
नागपूर शहरातील अनेक सामाजिक संस्था लोकांना गरजेच्या वेळी वैद्यकीय साधन सामुग्री उपलब्ध करून देतात. अनेक आजारासाठी वैद्यकीय साधन सामुग्री खरेदी करणे आवश्यक असते. त्याच्या वापरानंतर ती साधन सामुग्री त्यांच्यासाठी टाकाऊ वस्तू होऊन जाते. लोक आवाहनातून अशा सर्व वैद्यकीय साधन सामुग्री जमा करण्यासाठी महापौर वैद्यकीय साधन सामुग्री अधिकोष तयार करण्याचा संकल्प महापौर दयाशंकर तिवारी यांनी केला. ही साधनसामुग्री गरजूंपर्यंत पोहचविण्याचा त्यांचा मानस आहे. या सर्वांसाठी एक शिखर समिती तयार करण्यात येणार असून नाममात्र दरावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
माता दुग्ध अधिकोष (Mother Milk Bank)
कोव्हिड संसर्गाच्या काळात अनेक महिलांना कोव्हिड-१९ प्रादुर्भाव झाला. अशावेळी नवजात बालकांना दूध कसे पाजायचे असा प्रश्न उभा राहिला. येथे जर मानव दुग्ध अधिकोष (Human Milk Bank) राहिली असती तर जन्मजात बाळांना सहजरीत्या आईचे दूध प्यायला मिळाले असते. सध्याची महामारीची परिस्थिती लक्षात घेता अशा बाळांसाठी नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून ‘माता दुग्ध अधिकोष’ निर्माण करण्याचा संकल्प महापौर दयाशंकर तिवारी यांनी केला. माता व बालसंगोपन समितीच्या माध्यमातून हा अधिकोष पाचपावली सुतिकागृह येथे कार्यान्वित करण्यात येणार आहे.
सिकलसेल डे केअर व अनुसंधान केंद्र
नागपूर शहर हे महाराष्ट्रातील सिकलसेलचे हॉटस्पॉट म्हणून ओळखले जाते. ज्या प्रमाणात रोगांवर उपचार करण्याची यंत्रणा हवी त्या प्रमाणात या भागात यंत्रणा उपलब्ध नाही. या रोगांचे निदान एका छताखाली, एकत्रितदृष्ट्या करण्याच्या दृष्टीने मनपाच्या पाचपावली सुतिकागृहाच्या इमारतीत सिकलसेल डे केअर व अनुसंधान केंद्र सुरू करण्याचा महापौर दयाशंकर तिवारी यांचा मानस आहे. सिकलसेल रुग्णांची तपासणी ही नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या आजारासंदर्भात समुपदेशनाची सोयदेखिल येथे उपलब्ध राहणार आहे. ज्या ठिकाणी रोगाचा प्रसार जास्त आहे अशा ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून तपासणी शिबीर आयोजित करून रुग्णांचा शोध घेऊन त्यांना उपचार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सिकलसेल डे केअर व अनुसंधान केंद्राची राहील. भारत सरकार, नागपूर महानगरपालिका आणि महात्मे नेत्रपेढी संस्था या तिघांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात येईल. हा प्रकल्प संपूर्ण भारतासाठी सिकलसेल अनुसंधान सेंटर म्हणून ओळखप्राप्त व्हावा, असे महापौरांचे स्वप्न आहे.
एल.ई.डी. पथदिवे
शहरातील जुने पारंपरिक पथदिवे बदलून संपूर्ण शहरातील रस्त्यांवर एल.ई.डी. पथदिवे लावण्याच्या कार्याला चार वर्षांपूर्वी सुरूवात झाली. या प्रकल्पातील जे काही काम शिल्लक होते, त्याचा पाठपुरावा महापौर दयाशंकर तिवारी यांनी केला. या कार्यातील अडचणी दूर करून १०० टक्के एल.ई.डी. पथदिव्यांचे उद्दिष्ट गाठले. या एल.ई.डी. पथदिव्यांमुळे वीज बिलात मोठी बचत झाली आहे. चार वर्षांपूर्वी पथदिव्यांच्या बिलापोटी भरावी लागणारी रक्कम ३३ कोटींच्या घरात होती. आज ही रक्कम १८ ते १९ कोटींवर आली आहे. जेथे बचत होईल अशी कामे आणि जेथून महापालिकेच्या तिजोरीत पैसा जाईल अशा कामांना प्राधान्य देत महापौर दयाशंकर तिवारी यांनी वाटचाल कायम ठेवली आहे.
NSS च्या विद्यार्थ्यांकडून पुतळ्यांचे व्यवस्थापन आणि अग्निशमन प्रशिक्षण
नागपूर शहरातील पुतळ्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने योजना आखण्यात आलेली आहे. विद्यापीठाशी संलग्नित १५१ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) माध्यमातून यापुढे पुतळ्यांचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक महाविद्यालयातील रासेयोचे स्वयंसेवक एक-एक पुतळा दत्तक घेतील. पुतळा परिसरातील व्यवस्था रासेयोच्या माध्यमातून करण्यात येईल तर पुतळ्यांची साफसफाई महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येईल. रासेयाच्या विद्यार्थ्यांना मनपाच्या माध्यमातून प्रमाणपत्र देण्यात येईल.
रासेयाच्या याच स्वयंसेवकांना अग्निशमन विभागातर्फे अग्निशमन प्रशिक्षणसुद्धा देण्यात येईल. एका वर्षांत जवळपास ७५० जणांना प्रशिक्षण मिळाले तर परिसरात कुठेही आग लागली अथवा पसरली तर अग्निशमन दल घटनास्थळी पोहचेपर्यंत स्वयंसेवक आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करू शकेल. यामुळे प्राणहानी व वित्तहानी टळावी, हा यामागील उद्देश आहे. पुढील १० वर्षांत ७५०० नागरिकांना प्रशिक्षण देण्यात येईल.
विद्यार्थ्यांना टॅब्लेट-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेच्या शाळांत शिक्षण घेणारे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी महापालिकेच्या इयत्ता नववी, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना टॅब्लेट (Tablet) देण्याची तरतूद करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्याचे वाटप करण्यात आले. यासाठी सुमारे दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
इंग्रजी माध्यमांच्या शाळा
नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून इंग्रजी मीडियमचे दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी महापौरांच्या मार्गदर्शनात इंग्रजी मीडियमच्या शाळांचा प्रस्ताव तयार करण्यात आला. ह्या सर्व प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून चालू शैक्षणिक सत्रापासून शहरात सहा इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू होत आहेत.
महापौर प्रगल्भ विद्यार्थी योजना
नागपूर शहरातील विद्यार्थी शिक्षणाच्या बाबतीत कुठेही कमी राहू नये हा विचार करून महापौर दयाशंकर तिवारी यांनी प्रत्येक झोनमध्ये एक अभ्यासिका तयार करण्याचा निर्णय घेतला. महापौर प्रगल्भ विद्यार्थी योजनेअंतर्गत अभ्यासिका तयार होणार असून विद्यार्थी त्याचा लाभ घेऊ शकतील. या अभ्यासिकेमध्ये विद्यार्थी UPSC, MPSC आणि इतर स्पर्धात्मक परिक्षेची तयारी करु शकतील.
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी ई-लाइब्रेरी
याशिवाय नागपुरातील सेंट्रल एव्हेन्यूवरील गीतांजली चौकातील लाल शाळेच्या परिसरामध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अत्याधुनिक ‘ई-लायब्ररी’ तयार करण्यात येत आहे. मनपाद्वारे तयार करण्यात येत असलेली ही ‘ई-लायब्ररी’ ब्रिटीश ‘ई-लायब्ररी’च्या संकल्पनेवर आधारित असून यासाठी पाच कोटी रुपये निधी प्रस्तावित करण्यात आला आहेत. ई-लायब्ररीमध्ये संगणक संच, २४ तास इंटरनेट, विद्यार्थ्यांना अभ्यास, समूह चर्चा आदीसाठी वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे.
पदाधिकारी-अधिकाऱ्यांच्या समन्वयातून विकासकामे सुरू
नगरसेवकांच्या वॉर्ड फंडातून प्रभागांमध्ये अनेक विकासकामे होत असतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कामांना मंजुरी मिळूनही काही कामांचे कार्यादेश होऊनही ती कामे थांबविण्यात आली होती. महापौर दयाशंकर तिवारी यांनी यासंदर्भात मनपा आयुक्त व अधिकाऱ्यांशी समन्वय साधून प्रारंभी अतिआवश्यक आणि त्यानंतर अन्य कामे सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पहिल्या चरणात ६५ कोटी, दुसऱ्या चरणात म्हणजेच १५ ते २० दिवसांच्या अंतराने १३१ कोटी चे कामांना सभागृहातून मान्यता मिळाली.
कोरोना दरम्यान केलेले कार्य-
महापौर पदाचा जानेवारी महिन्यात पदभार स्वीकारला त्यावेळी कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात होती. त्यामुळे पदभार स्वीकारताच विकास कामांना प्रारंभ केला. प्रत्येक विभागाच्या बैठका, प्रलंबित कामांना मंजुरी, रखडलेल्या कामाला वेग, संथ गतीने सुरू असलेल्या कामांसाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना वेग देण्याचे कार्य सुरू केले. अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने पावले उचलली. मात्र, पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दीड महिन्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. मार्च महिन्याच्या सुरुवातीला कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली. हॉस्पीटलमधील बेड्स फुल्ल होऊ लागले. ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला. ही सर्व परिस्थिती बघता त्यांनी आरोग्य सुविधा बळकटीकरणाकडे आपला मोर्चा वळविला. सर्वप्रथम शहरातील कोरोना बाधितांवर तातडीने उपचार होणे याला प्राधान्य देत शहरातील ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर बेड्स वाढविण्यावर भर दिला. त्यासाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासोबतच ऑक्सिजन सिलिंडर खरेदीला प्राधान्य दिले. नागपुरातील आयुर्वेद कॉलेज, के.डी.के. आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्यात यश प्राप्त झाले. के.टी. नगर येथे नवे रुग्णालय सुरू केले. पाचपावली सुतिकागृहात ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यात आला. डॉक्टरांशी, आय.एम.ए.च्या आणि विदर्भ हॉस्पीटल असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी सातत्याने संवाद साधत बेड्सची संख्या सात हजारापर्यंत करण्यात यश मिळविले. शहरातील नागरिकांना बेड्सची संख्या, उपलब्धता माहिती व्हावी यासाठी केंद्रीय नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला. यासाठी त्यांनी शहरातील स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली. जे रुग्ण पॉझिटिव्ह होते त्यांना नियंत्रण कक्षातून फोन जाऊ लागले. त्यांची विचारपूस होऊ लागली. आपत्तीच्या या काळात सर्व स्वयंसेवी संस्थांना एकत्र आणत शहरात मोठ्या प्रमाणात सेवा कार्य घडले.
केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी समन्वय साधत शहरातील सर्व लोकप्रतिनिधी, आमदारांशी चर्चा करुनआरोग्याची उत्तमोत्तम व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न केले. यादरम्यान माझ्यासह संपूर्ण कुटुंब कोरोनाने बाधित झाले होते. पत्नी रुग्णालयात होती. असे असतानाही ‘होम आयसोलेशन’मधून आपल्या कार्याची सूत्रे चालविली. कोरोनाच्या पिक पीरेडमध्ये एक मिनिटही स्वस्थ न बसता आपला सेवायज्ञ सतत सुरू ठेवला. प्रशासनाशी योग्य समन्वयाने दोन महिन्यात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
आज इतर कार्यावर लक्ष देतानाच कोरोनाची तिसरी लाट गृहीत धरून आरोग्य सेवा बळकटीकरणाचे कार्य आजही सुरू आहे. त्याचा पाठपुरावा ते सातत्याने घेत आहे. याच मालेत पूर्व नागपुरातील हिवरी नगर येथे नव्याने नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले. दक्षिण नागपुरातील शाहू नगर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचा विस्तार करण्यात आला. मिनीमाता नगर आणि नारी परिसरात नागरी समूह आरोग्य केंद्र प्रस्तावित आहे. ३० बेड्च्या हॉस्पीटलची निविदा प्रक्रिया सुरू आहे. दाभा येथे ५० बेड्सचे आयुष हॉस्पीटल प्रस्तावित आहे. गांधी नगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयात १६ बेड्सचा अतिदक्षता कक्ष कार्यान्वित झाला आहे.
चाचणी आणि लसीकरणावर भर-
कोरोनाची साखळी तोडायची असेल तर प्रत्येक व्यक्तीची कोरोना चाचणी होणे आवश्यक होते. हे हेरून प्रशासनाने चाचणी केंद्रे वाढविली. दररोज २० हजारांवर चाचणीचे उद्दिष्ट ठेवले. आज कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असली तरी चाचण्यांची संख्या पाच हजारांवर आहे. एकीकडे चाचणीवर भर देतानाच भविष्यातील लाटेचा सामना करण्यासाठी लसीकरणावरही भर देण्यात आला. लस घेण्यासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये, गर्दी होऊ नये यासाठी लसीकरण केंद्रसुद्धा वाढविली आणि ती आजही वाढत आहे. नगरसेवकांच्या सहकार्याने अनेक प्रभागातील समाजभवन, शाळा, सभागृह लसीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात आले. सध्या शहरात १४० वर लसीकरण केंद्र असून गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यात यश मिळविले आहे.
00




आमचे चॅनल subscribe करा
