

टँकरने केला पाणी पुरवठा:अन्न धान्याचीही मदत
कोराडी २४ जुलै २०२२: शनिवार १६ जुलैला कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचा सकाळी राख बंधारा फुटल्या नंतर रात्रभरात तातडीने पाणी विसर्ग बंद करण्यात यश आले. विशेष म्हणजे, वीज केंद्राच्या अधिकारी,अभियंता आणि कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून हा पाणी विसर्ग बंद केला. सध्यस्थीतीत संततधार पाऊस पडत असला तरी राख बंधाऱ्यातील तातडीचे, अल्पकालीन नियोजनाचे काम हाती घेण्यात आले आहे.
महानिर्मितीचे संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे, कार्यकारी संचालक पंकज सपाटे, डॉ.नितीन वाघ यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली व त्यानंतर प्रत्यक्ष राखेमुळे कन्हान नदीपर्यंत झालेल्या नुकसानाची पाहणी केली.
१७ जुलैपासून परिसरातील बाधित व्यक्ती, प्राणी, शेतजमीन, नाले, विहिरी इत्यादींच्या नुकसानाबाबत जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आले. तसेच वीज केंद्राकडून प्राथमिक सर्व्हेक्षण,पाहणी मोहीम हाती घेण्यात आली. या कामी महानिर्मितीने स्थानिक पातळीवर समिती गठीत करून ही कार्यवाही पूर्ण केली. बाधित नागरिक आणि स्थानिक सरपंचाच्या मागणीनुसार या गावात टँकरद्वारे तातडीने पाणी पुरवठा करण्यात आला आणि सोबतच परिसरात रोगराई पसरू नये याकरिता ब्लिचिंग पावडरचा छिडकाव करण्यात आला.
म्हसाला टोली वस्ती, रेल्वे लाइनच्या खाली बाधित नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार वीज केंद्रातर्फे जीवनावश्यक वस्तू तातडीने देण्यात आल्या. त्यामध्ये दीड ते दोन महिना पुरेल एवढे गहू, तांदूळ, तूर डाळ, मिरची पावडर, हळद, जिरा, मोहरी, तेल पॉकेट्स, बिस्किट्स, साबण या आवश्यक अन्न पुरवठयाच्या वस्तुसह १५ परिवाराला वितरित करून बाधितांना दिलासा देण्यात आला. तसेच बाधित नागरिकांच्या घरी पाणी गेल्याने प्रत्येक परिवाराला गादी, उशी, मुलांसाठी शाळेची पुस्तके आणि गणवेश वाटप लवकरच करण्यात येत आहे.

सरपंच रवि पारधी, ग्रामपंचायत सदस्य,सरपंच नरेंद्र धानोले आणि तेथील प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते निलेश डफरे, ग्रामपंचायत सदस्य रवी कुहिते, सुनंदा मनगटे, किरपाने ,विनीत रहांगडले, अखिल अहमद, निलेश डफरे इत्यादी उपस्थित होते.
कोराडी वीज केंद्राचे मुख्य अभियंता अभय हरणे यांच्या मार्गदर्शनानुसार बाधित परिवाराला मदत देण्याचे नियोजन करण्यात आले. खैरी ग्रामपंचायतचे सरपंच बंडू कापसे यांच्या खैरी गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहीरीचा गढूळ पाण्यामुळे उपसा करावे लागल्याने सुमारे पांच दिवस दोन वेळा पिण्याच्या पाण्याचे वॉटर टँकर महानिर्मितीकडून पुरविण्यात आले. म्हसाळा खसाळा रेल्वे पुलाखाली साठलेली राख काढण्यात आली. लवकरच रस्ता डागडुजी काम दोन दिवसांत सुरू होणार आहे.
सुजाता सोनटक्के, तामलिंग मडावी, प्रल्हाद बडगुजर, इंदिरा भोयर, मोहम्मद गुलजार, मोहम्मद साबीत खान, संतोष समुद्रे,मुन्ना नदाब,संतोष परते, तौकिर अहमद,राजेश विश्वकर्मा, भाऊरावजी पाटील,प्रफुल्ल ठवकर, जहीर खान, रहमती अन्सारी इत्यादी बाधित परिवाराला अन्नधान्य वितरित करण्यात आले.बाधित गावातील नागरिकांनी तातडीची मदत दिल्याबद्दल वीज केंद्र प्रशासनाचे आभार मानले.




आमचे चॅनल subscribe करा
