

बी.एड परिक्षेचाच न्याय आरोग्य विभागाच्या परिक्षेला का नाही?
मनपा आयुक्त आता आरोग्य मंत्री टोपे यांच्यावर गुन्हा दाखल करतील का?विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. २८ फेब्रवरी: महाराष्ट्राच्या आरोग्य विभागातर्फे आज रविवार दि. २८ फेब्रुवरी रोजी सकाळी ११.३० वा. विविध अभ्यासक्रमाअंतर्गत विविध केंद्रांवर परिक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या मात्र दूसरीकडे राज्य सरकारनेच येत्या ७ मार्चपर्यंत राज्यात लॉक डाऊन सदृष्य परिस्थिती घोषित केली असून नागपूर महानगरपालिका तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यात आणखी शनिवार,रविवार ‘बंद’ची घोषणा केली त्यामुळे आज, कालप्रमाणेच संपूर्ण शहरच ‘बंद’होते याचा सर्वाधिक फटका आज मराठवाडा,लातूर,सोलापूर,औरंगाबाद किंबहूना संपूर्ण विदर्भ व महाराष्ट्रातून नागपूरात, परिक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना बसला,एवढंच नव्हे तर अनेक विद्यार्थी हे उपाशीच परतले असल्याची धक्कादायक घटना आज ‘आदरातिथ्यासाठी’प्रसिद्ध असणा-या विदर्भ,नागपूरात घडली.
राज्य शासनाच्या अारोग्य विभागातर्फे गेल्या वर्षी २०१९ मध्ये घोषित केलेली परिक्षा करोनाच्या प्रादुर्भावाचा उच्चांक बघता रद्द करण्यात आली होती.या वर्षी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अख्यारित असणा-या या विभागाने रद्द झालेली ही परिक्षा आज रविवार दि. २८ फेब्रुवारी घेण्याची घोषणा केली.या परिक्षेसाठी शहरातील विविध केंद्रावर महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या परिक्षार्थींनी एकच गर्दी केली मात्र नागपूर महानगरपालिका तसेच जिल्हाधिकारी कार्यालयसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पुकारण्यात आलेल्या ‘बंद‘मध्ये या परिक्षेसाठी येणा-या, शहरासह ग्रामीण भागात परिक्ष्ा केंद्र मिळालेल्या परिक्षार्थींसाठी कोणत्याही सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या नव्हत्या!
परिणामी आज शहरभरातील विविध केंद्रांवर लांबचा प्रवास करुन आलेल्या दमल्या भागल्या विद्यार्थ्यांना परिक्षेनंतर ‘उपाशीच’ परतावे लागल्याची घटना घडली!
अनेक विद्यार्थ्यांकडून ऑटो चालकांनी दुप्पट भाडे वसूल केल्याची व्यथा विद्यार्थ्यांनी खास ‘सत्ताधीश’कडे मांडली.याशिवाय चहा,नाश्ताचे ठेले,हॉटेल आदी सर्व बंद असल्याची कल्पना या बाहेरगावावरुन आलेल्या या विद्यार्थ्यांना नसल्याने त्यांचे नागपूरच्या रणरणत्या उन्हात चांगलेच हाल झाले.

अनेक विद्यार्थ्यांनी आरोग्य विभागाच्या एक साथ चार-चार विविध अभ्यासक्रमाच्या परिक्षेसाठी अर्ज भरले होते.त्यांना आजच्या बंदमुळे चांगलाच फटका बसला असून काही विद्यार्थी हे फक्त चार ऐवजी फक्त दोनच परिक्षा केंद्रावर पोहोचून परिक्षा देऊ शकले.इतर विद्यार्थी मात्र पैसे भरुन देखील एकाच परिक्षेत उपस्थित राहू शकले,याचा देखील विद्यार्थ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला.
केवळ नागपूरच नव्हे तर महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना गौंडखैरीसारखे केंद्र मिळाले.हे केंद्र म्हणजे अक्ष् र श: जंगलात असल्याने व मुख्य रस्त्याच्याही ४ ते ५ किलोमीटर आत असल्याने अनेक विद्यार्थ्यांची तारंबळ उडाली.हे केंद्र नागपूरपासून १७ ते १८ किलोमीटर दूर असून एवढ्या लांबून आलेले परिक्षार्थी मुख्य रस्त्यांपासून ४ ते ५ किलोमीटर जंगलात असणा-या परिक्षा केंद्रावर अक्ष् रश:चालत गेले!परिणामी परिक्षा केंद्रावर परिक्षार्थ्यांची उपस्थिती ही फक्त १० च्या जवळपास असल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले.
नुकतेच याच महिन्यात मागच्या आठवड्यात २४ फेब्रवरी रोजी वाढत्या करोनाच्या प्रादुर्भावाचे कारण सांगून नागपूर विद्यापीठाने बी.एड.ची परिक्षा ऐन परिक्ष्ेच्या एक तास आधी रद्द केली!परिक्षा केंद्रावर पाेहोचलेले विद्यार्थी आल्या पावली परतलीत. तेव्हा मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी परिक्षा रद्द न केल्यास गुन्हा दाखल करु असा समज विद्यापीठाला दिला होता, मात्र आज चक्क आरोग्य विभागाच्या परिक्ष्ेचे आयोजन त्यांनीच पुकारलेल्या ‘बंद’दरम्यान करण्यात आले,आता मनपा आयुक्त, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर गुन्हा दाखल करतील का?असा संताप ही अनेक परिक्षार्थींनी व्यक्त केला.
राज्य सरकारचे सर्व नियम हे नागपूर विद्यापीठांच्या परिक्षासाठी आहे तर नागपूरात जेईई मेन्स,आयबीच्या २८ फेब्रुवरी रोजी परिक्षा कश्या पार पडल्या?असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.
थोडक्यात राज्य शासन व मनपा,जिल्हाधिकारी कार्यालयासारखे स्थानिक स्वराज्य संस्था हे सर्रास करोनाच्या सबबीखाली नियोजनशून्यजनजीवन ‘ठप्प’करतात, दूसरीकडे असा ‘बंद’पाळताना नागपूर शहरात पार पडणा-या विविध परिक्षा यांचे वेळापत्रक न तपासता हजारो किलोमीटरवरुन येणा-या परिक्षार्थीं यांना उपाशी परतून लावतात,हेच मायबाप शासनाच्या ‘लॉक डाऊनचे’यश आहे,असे आता बोलले जात आहे.शहर बस सेवा उपलब्ध नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना ऑटोसाठी चांगलाच भुर्दंड सहन करावा लागला.महानगरपालिकेने परिक्षेची वेळ बघून निदान शहर बस सेवा तरी सुरु ठेवायला हवी होती,अशी तक्रार अनेक विद्यार्थ्यांनी केली.




आमचे चॅनल subscribe करा
