फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशआज मध्यरात्रीपासून १५ एप्रिलपर्यंत 'भारत लॉकडाऊन'; मोदींची घोषणा

आज मध्यरात्रीपासून १५ एप्रिलपर्यंत ‘भारत लॉकडाऊन’; मोदींची घोषणा

Advertisements

नवी दिल्ली: २२ मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’ यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचे आभार मानलेत. देशावर संकट आलं, मानवतेवर संकट आलं तर आपण सर्व भारतीय एकत्र येऊन कसा त्याचा मुकाबला करतो हे ‘जनता कर्फ्यू’द्वारे भारतानं दाखवून दिलं, असं म्हणत त्यांनी देशवासियांचं कौतुकही केलं. सोबतच, आज मध्यरात्री १२.०० वाजल्यापासून पुढचे २१ दिवस अर्थात १५ एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आहे. या लॉकडाऊनचं नागरिकांनी पालन करावं, अशी विनंती पंतप्रधान मोदींनी नागरिकांना केलीय.

प्रत्येक भाग, प्रत्येक जिल्हा प्रत्येक राज्य आणि संपूर्ण देशात हा लॉकडाऊन घोषित केला जातोय, देशाला वाचवण्यासाठी, देशातील प्रत्येक नागरिकाला वाचवण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकावर घरातून बाहेर पडण्याची बंदी लावली जात आहे, हा लॉकडाऊन पुढचे २१ दिवस अर्थात तीन आठवड्यांचा असेल असं मोदींनी स्पष्ट केलं.

करोना व्हायरस संक्रमणाचं कालचक्र तोडण्यासाठी २१ दिवसांचा काळ प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हे २१ दिवस यशस्वीरित्या हाताळले गेले नाहीत तर देश आणि तुमचं कुटुंब २१ वर्ष मागे जाईल किंवा नष्टही होऊ शकतं. हे म्हणणं मी पंतप्रधान म्हणून नाही तर तुमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून मांडतोय. त्यामुळे पुढचे २१ दिवस घरातून बाहेर पडण्याचं विसरून जा, असं भावनिक आवाहन मोदींनी नागरिकांना केलं.
लॉकडाऊन’च्या काळात देशातील प्रत्येक भाग, प्रत्येक जिल्हा, प्रत्येक राज्य आणि संपूर्ण देशच लॉकडाऊन असेल. देशाला वाचवण्यासाठी, देशातील प्रत्येक नागरिकाला वाचवण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकावर घरातून बाहेर पडण्याची बंदी लावली जात आहे, असं पंतप्रधान मोदींनी यांनी यावेळी म्हटलं.

संपूर्ण जगाला या महारोगानं हात टेकायला लावलेत. हे देश यासाठी प्रयत्न करत नाहीत असं नाही किंवा त्यांच्याकडे संसाधनांची कमतरता आहे असंही नाही. परंतु, वास्तवात करोनाचं संक्रमण ज्या वेगानं फैलावतंय त्यामानाने अनेक प्रयत्न फोल ठरत आहेत. काही लोकांच्या बेपर्वाईमुळे आणि चुकीच्या विचारांमुळे तुमचे आई-वडील, मुलं, कुटुंब, मित्र-मैत्रिणी आणि संपूर्ण देशच मोठ्या संकटात सापडू शकतो. बेपर्वाई अशीच सुरू लागली तर देशाला त्याची किती किंमत चुकवावी लागेल, याचा अंदाजाही लावणं कठीण, असं म्हणत निष्काळजी नागरिकांना मोदींनी फटकारलं.

गेल्या दोन दिवसांपासून देशातील अनेक भागात लॉकडाऊन करण्यात आलंय. राज्य सरकारचे हे प्रयत्न गंभीरतेनं घ्यायला हवेत. आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांच्या आणि इतर देशांचा अनुभव ध्यानात घेता देशात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात येतोय, असं पंतप्रधानांनी म्हणताचअनेक नागरिकांना आता पुढे काही तरी नवी घोषणा होतेय याची जाणीव झाली.या लॉकडाऊनमुळे देशाला आर्थिक नुकसान होईल. परंतु, एका एका भारतीयाचा जीव वाचवणं हीच भारत सरकारची सर्वात मोठी प्राथमिकता आहे, असंही मोदींनी म्हटलं.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या