फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजअरविंदबाबू हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे कैवारी होते:  नाना पाटेकर

अरविंदबाबू हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे कैवारी होते:  नाना पाटेकर

Advertisements

स्व. अरविंदबाबू देशमुख पूर्णाकृती पुतळा अनावरण समारंभ

बँकेचे अध्यक्ष डॉ. आशिष देशमुख यांचे आयोजन.

काटोल,दिनांक २ डिसेंबर २०२२:  विधायक कार्याचे जनक स्व. अरविंदबाबू देशमुख यांच्याबद्दल बरेच ऐकले होते. परंतु प्रत्यक्ष काटोलमध्ये येऊन त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल जाणून घेता आले. देशमुख परिवाराने काटोल-नरखेड तालुक्यांत वर्षानुवर्षे समाजसेवेचा वारसा टिकवला आहे. स्व. अरविंदबाबू यांच्यानंतर रणजीतबाबू देशमुख आणि डॉ. आशिष देशमुख यांनी समाजसेवेला वाहून घेतल्याचे चित्र दिसत आहे. राजकारणातून समाजसेवेचे हे उत्तम उदाहरण आहे. शेतकरी हा समाजाचा कणा आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांची प्रगती होणार नाही, तोपर्यंत भारत समृध्द होऊ शकत नाही. स्वातंत्र्य सेनानी अरविंदबाबू हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे कैवारी होते, थोर समाजसेवक होते.असे प्रतिपादन सुप्रसिध्द सिनेअभिनेते व सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांनी केले.

विधायक कार्याचे जनक स्व. अरविंदबाबू देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ शुक्रवार, दि. ०२ डिसेंबर, २०२२ ला अरविंद सहकारी बॅंक लि. मुख्यालय, मेन रोड, काटोल येथे संपन्न झाला. हा अनावरण समारंभ  नाना पाटेकर यांच्या शुभहस्ते पार पाडण्यात आला. त्यानंतर तालुका क्रीडा संकुल, धंतोली, काटोल येथे आयोजित एका भव्य सभेत ते बोलत होते.

याप्रसंगी बोलताना नाना पाटेकर म्हणाले,की त्यांच्या नावाने अरविंद सहकारी बॅंक स्थापन करून डॉ. आशिष देशमुख यांनी त्यांच्या स्मृती जपण्याचे मोठे काम केले आहे. आजही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, ही दुःखद बाब आहे. शेतकरी आत्महत्या हे आजचे सर्वात मोठे विदारक चित्र आहे.ते बदलणे आवश्यक आहे. राज्यात सरकार कुणाचेही असो, ज्या दिवशी शेतकरी आत्महत्या करणे थांबवेल त्या दिवशी महाराष्ट्र सुजलाम सुफलाम समजावा. राजकारणी लोकांनी आपल्यामधील भिंती पाडून काम केल्यास जनतेचे भले होईल. मी राजकारणावर बोलणार नाही. सामाजिक जाणीव ठेऊन काम करणे गरजेचे आहे. जनतेने स्वत:मधील ताकद ओळखावी, म्हणजे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करता येईल. जास्त हव्यास न ठेवता गरजेपुरते मिळाले तरी समाधान मानावे”असे नाना पाटेकर म्हणाले.,

अरविंद सहकारी बँक लि. चे अध्यक्ष डॉ. आशिष देशमुख यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, “थोर समाजसेवक आणि शेतकरी नेते स्व. अरविंदबाबू देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शेतकऱ्यांच्या हितासाठी झटत असलेल्या  नाना पाटेकर यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाच्या उपस्थितीत होत आहे, म्हणून या सोहळ्याला विशेष महत्व आहे.  नाना पाटेकर यांनी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून एक लोकचळवळ सुरू केली. त्या चळवळीतून त्यांनी दुष्काळी भागात तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत केली. चित्रपटाच्या पडद्यावरचा उपदेश आणि प्रत्यक्ष जीवनातील अशी कृती या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. नाना पाटेकर अशा वेगळ्या म्हणजे कर्त्या सुधारक व्यक्तिमत्त्वांपैकी आहेत. मी त्यांच्या कार्याला अभिवादन करतो.

शेतकऱ्यांचे प्रश्न अतिशय बिकट आहेत. त्यांच्यासाठी भरपूर काम करावे लागेल. त्यासाठी  नाना पाटेकर यांच्यासारख्यांचे मार्गदर्शन आणि नेतृत्व लाभले तर ते काम वेगाने पुढे जाऊ शकते. भारताला आपण कृषीप्रधान देश म्हणत असलो तरी सकल राष्ट्रीय उत्पन्नातील शेतीचा वाटा १५-१६ टक्क्यांच्या आसपास आहे. याचा अर्थ शेतीतून येणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत तिच्यावर अवलंबून असलेली लोकसंख्या अधिक आहे. हे चित्र बदलल्याखेरीज शेतकऱ्यांचे जीवन सुधारणार नाही. आम्ही काटोल-नरखेड भागात काही प्रयोग केले,करीत आहोत, भविष्यातही या क्षेत्राची सेवा करण्याची इच्छा आहे.

रिझर्व बॅंक ऑफ इंडियाच्या नियमांप्रमाणे अरविंद सहकारी बँक लि. ची सेवा १८ मार्च १९९८ ला लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. निरंतर प्रगती करत आज या लोकप्रिय बँकेच्या काटोल, सावनेर, गांधीबाग नागपूर, डिगडोह नागपूर, वरुड, अमरावती अशा ६ शाखा आहेत. माझे आजोबा आणि रणजीतबाबू देशमुख यांचे पिताश्री स्व. अरविंदबाबू देशमुख यांच्या नावाने सुरु केलेल्या या बँकेने ग्राहकांच्या हृदयात मानाचे स्थान मिळविले आहे.

“देशमुख घराणे हे इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध लढणारे काटोल तालुक्यातील प्रमुख घराणे होते. अरविंदबाबू देशमुख यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा व तत्वज्ञानाचा पगडा होता. दहावी पास होताच सामाजिक जाणीव जोपासून त्यांनी स्वतंत्रता संग्रामात उडी घेतली. ते उपजतच एक समाजनेता होते. राजकीय वारस्याची धुरासुद्धा त्यांनी समर्थपणे सांभाळली. १९४० मध्ये ते सक्रीय राजकारणात सहभागी झाले. त्या

काळातील पंचायत राज पद्धतीमध्ये जनपत सभेच्या अध्यक्ष पदावर ते नियुक्त झाले. त्यांनी नागपूर संत्रा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्षपद भूषविले. तसेच भू-विकास बँकेचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी कार्यभार सांभाळला.

त्यांनी सामाजिक, कृषी, शिक्षण, संस्कृती, राजकारण या साऱ्याच क्षेत्रात शिस्तीचे पालन करीत उल्लेखनीय कार्य केले. ते स्वत: एक मोठे शेतकरी होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत त्यांना विशेष जिव्हाळा व चिंता होती. शेतकऱ्यांची प्रगती व्हावी, म्हणून त्यांनी वेगळ्याने विचार केला. त्यांच्या कृषीविषयक क्रांतीमुळे शेतकरीवर्ग सुद्धा मोठ्या विश्वासाने त्यांची मदत घेत असे. जनपत सभेचे अध्यक्ष म्हणून ते शेतकरी, गरीब व सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गासाठी विशेष झटत होते. नागपूर जिल्ह्यात त्यांनी दुधापासून संत्र्यापर्यंत सहकारी संस्था निर्माण केल्या तसेच ग्रामविकास व ग्रामसंस्कृती जपण्यात मोलाचे कार्य केले. ग्रामीण भागातील पुढच्या पिढीने शिकले पाहिजे, यासाठी त्यांनी प्रयास केले. प्रचंड जनसंपर्क आणि सामाजिक जाणीव असल्यामुळे अरविंदबाबू जनमानसात लोकप्रिय होते.

स्वतंत्रता सेनानी आणि शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून त्यांची ओळख आजही लोकांनी जपून ठेवली आहे. त्यांच्या नावाने असलेली अरविंद सहकारी बॅंक लि. ही भविष्यातसुद्धा ग्राहकांना चांगली सेवा देईल. स्व. अरविंदबाबूंच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करून त्याच्या पावन स्मृती दिव्याच्या ज्योतीप्रमाणे आपणांसर्वांना प्रकाशित करत राहतील, असा विश्वास आहे.” कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री  रणजीतबाबू देशमुख उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. सोबत डॉ. भाऊसाहेब भोगे, रुपा देशमुख,  आयुश्री आशिषराव देशमुख उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. आशिष देशमुख यांनी नाना पाटेकर यांचा शाल, श्रीफळ व आकर्षक प्रतीकात्मक बैलगाडी देऊन सत्कार केला. काटोल नरखेड तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना १५ हजारांच्या धनादेशांचे वाटप नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या