फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशअदानीची धोरणे,मोदींची अंमलबजावणी व भागवतांचे प्रमाणपत्र!

अदानीची धोरणे,मोदींची अंमलबजावणी व भागवतांचे प्रमाणपत्र!

Advertisements


मोहन प्रकाश यांची जळजळीत टिका

अदानी आधी योजना जाहीर करतात मोदी त्याच योजनांची जाहीर करतात सबसिडी!

मोदी सरकार अदानीची कठपुतली सरकार:अदानीला विदेशात मोदींची साथ

अदानीच्या समुद्री बंदरांवर हेरॉईन सापडते,हिरो कधीच सापडत नाही

एलआयसी,एसबीआयमधील जनतेचा पैसा मोदींनी घातला अदानीच्या घश्‍यात

नागपूर,ता.१७ फेब्रुवरी २०२३: चीन सारख्या देशात भारताची आयात ९ टक्क्यांवर आली आहे तर दहा महिन्यांमध्ये निर्यातीत ३४ टक्के घट झाली आहे,कुठे चालला आहे आपला देश?चीन हा मित्र देश नाही तरी देखील अश्‍या देशावर भारताची निर्भरता वाढत राहीली तर देशाचे काय होणार?नागपूर ही संघ भूमी आणि मोहन भागवतांचं शहर आहे,आधी आम्हाला वाटायचं की देशाची नीती ही नागपूरमधून,संघभूमीतून नियंत्रित होत आहे मात्र या गोष्टीमुळे हे सिद्ध होतंय की देशाची धोरणे सुप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी ठरवत असतात व त्याची अंमलबजावणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात तर त्याला प्रमाणपत्र देण्याचे काम सरसंघचालक मोहन भागवत करतात,अशी जळजळीत टिका अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे राष्ट्रीय प्रवक्ते मोहन प्रकाश यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत केली.

यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी,गौतम अदानी व मोहन भागवतांना चांगलेच धारेवर धरले व अनेक गंभीर आरोप केले.यावेळी मोहन भागवतांना आव्हान देत ते म्हणाले,की या तथ्यावर आता भागवतांनीच खुलासा करावा कारण तुम्हीच अदानीला राष्ट्रभक्ताचे प्रमाणपत्र दिले आहे.हाच का तुमचा राष्ट्रवाद?हीच का तुमची देशभक्ती की देशातील ४० ते ४१ ऑर्डिनन्स फॅक्टरी यांचे खासगीकरण केले जात आहे तरी देखील तुम्ही देशभक्तीचे प्रमाणपत्र देता?देशातील बॅकांचा पैसा बूडत आहे,बँकांचे अर्थकारण सातत्याने वाईट होत चालले आहे तरीही सातत्याने मोदींंचे मित्र अदानी हे याच बँकांकडून कर्ज घेत सूटले आहेत!

डी.बी.पॉवरसोबत जो करारनामा अदानीचा झाला होता,मात्र ७ हजार कोटींसाठी देशात इतकी टिका झाली की धन दांडग्या पूंजीपती अदानीला हा पैसा उभारता न आल्याने हा करार रद्द करावा लागला,हे सिद्ध करतं की मोदींची यात हिस्सेदारी आहे,या पेक्षा भ्रष्ट सरकार व सरकारी मालमत्तेची खुलेआम लृट देशाच्या इतिहासातच नव्हे तर जगात या पूर्वी कधीच झाली नाही,अशी घणाघाती टिका त्यांनी केली.मोदींचा खरा चेहरा बेनकाब करुन त्यांचा खरा चेहरा देशासमोर आणायचे काम काँग्रेस पक्ष करणार असल्याचे ते म्हणाले.

अदानी-मोदी यांच्या युतीवर घणाघात करताना ते म्हणाले,की ज्या योजना अदानी हे तीन महिन्यांपूर्वी घोषित करतात की आम्ही अमूक अमूक क्षेत्रात काम करणार आहोत,दोन महिन्यांनंतर मोदी त्याच क्षेत्रात सबसिडी जाहीर करतात!सरकारी मालमत्ता ही जनतेच्या पैशांनी निर्माण होत असते,बँकांमध्ये जनतेचा पैसा असतो,मात्र नाममात्र भाडेतत्वावर म्हणजे लीजवर जनतेच्या पैश्‍यातून उभारलेली ही देशाची मालमत्ता अदानीला कर्जाच्या रुपात प्रदान केली जात आहे, ते हे कर्ज फेडू शकत नाही तेव्हा एनपीए करुन ती कर्ज माफ केली जातात.नुकतेच १२ हजार कोटी रुपये असेच माफ करण्यात आल्याचे संसदेच्या पटलावर माहिती ठेवण्यात आली.

बाबा रामदेव यांचे देखील १२ हजार कोटींचे कर्ज बाकी असताना त्याच बँकेकडून त्यांना कर्ज देण्यात आले.मोदी सरकार अदानीची कठपुतली सरकार असून मोदींनीच सांगावे ते इतर राष्ट्रात अदानीला कोणत्या नात्याने आपल्या विमानात सोबत घेऊन जातात?असा सवाल त्यांनी केला.इस्त्राईलमध्ये मोदींनी अदानीला सोबत नेले,बांग्लादेश,ऑस्ट्रेलिया,श्रीलंकेतही मोदींनी सोबत अदानीला का नेले?मोदी हे अदानीचे एजेंट आहेत का?इतर राष्ट्रांसोबत उद्योग व्यवसायासंबधी बोलणी करने हे मोदींचे काम आहे की मंत्रालयाचे काम आहे?

मोदींची कार्यपद्धती अशी आहे की एकदाही त्यांनी विदेशात गेल्यानंतर देशातील जनतेला सांगितले की अमूक-अमूक देशात जाऊन मी देशहितासाठी अशी-अशी बोलणी केली,असे-असे निर्णय घेतले.मोदींना कधीही देशातील जनतेला हे सांगायची,कळवण्याची गरजच वाटत नाही.ही तर या देशाची परंपरा होती की आजपर्यंत जो कोणी पंतप्रधान इतर देशात गेला त्यांनी देशातील जनतेला माहिती दिली.मोदींनी असे एकदाही केले नाही.

तीन कृषि कायदे मोदींनी ज्या हेतूने संसेदत कोणतीही चर्चा न करता लागू केली होती आणि ज्या कायद्यांना आम्ही विरोध केला होता,देशाच्या कृषि क्षेत्रालाही आपल्या धनदांडग्या उद्योगपतींकडे गहाण ठेवण्यासाठीच ते तीन कायदे मोदींनी लागू केले होते.बिल यायच्या आधीच अदानीने देशभर अन्नधान्य साठवणूकीचे सायलो बनवणे सुरु कले होते,याचा अर्थ काय?याचा अर्थ देशाचे धोरण मोदी सरकार ठरवत नसून अदानी ठरवत असल्याचा घणाघाती आरोप याप्रसंगी त्यांनी केला.

देशातील सात ही सर्वाधिक महत्वाचे समुद्री बंदर मोदींनी अदानीच्या नावे केले असून त्यांच्याच बंदरांवर हजारो कोटींचे अम्ली पदार्थ जप्त होत असतात.अगदी तीन हजार कोटींची जप्ती संबंधित शाखे कडून झाली.कुठे सहाशे तर कुठे सहाशे कोटींचे अम्ली पदार्थ अदानी यांच्याच बंदरातून जप्त झाले मात्र आजपर्यंत अदानीच्या या बंदरावरुन ‘हेरॉईन’पकडल्या गेली ‘हिरो’कधीच पकडल्या जात नाही.ना कधी याची चौकशी होत.मुंबईतील एक तरुण फक्त अम्ली पदार्थाविषयी एका व्हॉट्स ॲप ग्रूपमध्ये चॅटिंग केल्याने तीन महिने कारागृहात होता.एक १६-१७ वर्षाच्या तरुणीजवळ एवढासा गांजा मिळाला,तिला ही तुरुंगात डांबले,मोदीनीच सांगावे तीन हजार कोटींचा गांजा पकडला जातोय,काहीच चौकशी का नाही?

या देशात एकाधिकारशाही माजली आहे.देशातील विमानतळेही विकायला काढली.ज्या उद्योगपतींना हवाई क्षेत्रातील विकासामध्ये रुची आहे त्यांनी ती घ्यावी मात्र कोणालाही दोनपेक्षा जास्त मिळणार नाही,हा नियम बनवला होता मात्र, सगळे नियम धाब्यावर बसवून मोदींनी सहाच्या सहा विमानतळे त्यांचे परममित्र अदानींला सोपवले.मुंबईच्या विमानतळावर अदानीची नजर फार पूर्वीपासूनच होती.ती मिळत नाही हे बघून त्यांच्यावर प्राप्तीकर विभाग,सक्तवसुली संचनालयाचा दबाव कसा-कसा आला हे तारखेवार सांगता येईल.आपल्या उद्योगपती मित्र अदानीला मुंबईचे विमानतळ दानमध्ये देण्यासाठी मोदींनी केंद्रिय यंत्रणांचा दुरुपयोग केला असल्याचा आरोप यायप्रसंगी मोहन प्रकाश यांनी केला.

राहूल गांधी हीच मागणी करीत आहे.एवढ्या गंभीर मुद्दांवर संसदीय समिती गठीत केली जात नाही,चौकशी करु दिली जात नाही.रिझर्व बँकेसारख्या राष्ट्रीयकृत बँकेला सातत्याने कमकुवत करण्याचे काम पंतप्रधान मोदी करीत आहेत.जगात कोणत्याही देशाची प्रतिमा ही त्या देशातील राष्ट्रीयकृत मध्यवर्ती बँकेच्या सुदृढ स्थितीवरुन निर्धारित होत असते.देशाच्या प्रतिमेचे आकलन पंतप्रधानाच्या चेह-याकडे बघून होत नसतं.त्या देशाच्या मध्यवर्ती बँकेची नीती आणि स्थिती यावरुन देशाची प्रतिमा निर्धारित होत असते.मात्र मोदी यांनी गेल्या ९ वर्षांच्या कार्यकाळात सातत्याने रिझर्व बँकेला कमकुवत करण्याचेच धोरण अंगिकारले असल्याचा आरोप यावेळी मोहन प्रकाश यांनी केला.

रिझर्व बँकेचे पत धाेरण देखील त्यांच्या प्रिय मित्राला फायदा पोहोचविण्यासाठीच राबविले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.१३ बंदरे अदानी कडे आहे आणि देशातील ९० टक्के कार्गो याच बंदरातून होत असतो.इतर उद्योगपतींना कोणतीही संधी मिळत नाही,सर्व काही अदानीसाठी पंतप्रधान कार्यालयातून निर्धारित केल्या जातं.

पेट्रोल पासून तर अन्न धान्यापर्यंत महागाई वाढत आहे मात्र सरकारकडून यावर काहीही बोलल्या जात नाही.कोणत्याही बंधनाशिवाय देशाची संपूर्ण सरकारी मालमत्ता पंतप्रधान मोदी हे अदानीला बहाल करीत सुटले आहे.स्वातंत्र्यानंतर सार्वजनिक विभागाची निर्मितीच यासाठी झाली होती की देशात कोणत्याही उद्योगपतीची एकाधिकारशाही स्थापित होऊ नये.मात्र आता सार्वजनिक सेक्टर, जो उभारण्यात देशाच्या जनतेचा पैसा लागला आहे,ती संपूर्ण मालमत्ता एकमेव गौतम अदानीला बहाल केल्या जात आहे.

पंतप्रधानांना याबाबत संसदेत प्रश्‍न विचारला गेल्याने राहूल गांधी व खरगे यांचा मुद्दाच संसदेच्या पटलावरुन काढून टाकल्या जातो.स्वतंत्र भारतात एखादा खासदार, देशाच्या पंतप्रधनांना हे नाही विचारु शकत की तुम्ही गौतम अदानीला किती वेळा व कशासाठी स्वत:च्या विमानात बसवून इतर राष्ट्रांमध्ये घेऊन जाता?एलआयसी जी देशाच्या पंचवार्षिक योजनामध्ये मोलाचे योगदान देत होती,३० कोटी जनतेने त्यात आपल्या घामाचा पैसा ओतला आहे,त्या एलआयसीचे समभाग अदानीसारख्या उद्योगपतीला देऊन टाकण्यात येत असेल तर संसदेत यावर प्रश्‍न ही विचारला जाऊ नये ?डिसेंबरमध्ये ८० हजार कोटींच्या जवळपास एलआयसीजवळ जे अदानीचे शेअर्स होते त्यांची किंमत कोसळली आणि आज एलआयसीच्या शेअर धारकांना जवळपास ४४ कोटींचे नुकसान सहन करावे लागले आहे.


यावेळी देश अत्यंत गंभीर स्थितीतून जात असल्याचे त्यांनी सांगितले.संविधानात नमूद आहे की देशाचा पंतप्रधान हा संसदेप्रति जबाबदार असेल.एक वेळ अशी होती की इंदिरा गांधींनी सर्व मंत्र्यांना पत्र लिहले होते की संसदेमधील कोणत्याही खासदाराचे पत्र तुमच्याकडे येईल मग ते पक्षातील असो किवा विरोधकांचे असो,एका आठवड्यात त्याचे उत्तर द्या.आज देशात काय स्थिती आहे?आज संसदेत विरोधकांच्या नेत्यांनी प्रश्‍न उपस्थित केल्यास त्याचे उत्तर देणे तर दूर त्यांच्या प्रश्‍नांनाच पटलावरुन काढून टाकल्या जात आहे.

आज देशात महागाई आणि बरोजगारी सरकार प्रायोजित आहे.‘जनता को लृटो और अपने मित्र को बांटो’असे धोरण राबविले जात असल्याचा घणाघाती आरोप यावेळी त्यांनी केला.

आज देशात सर्व संवैधानिक संस्थाच कमजोर केल्या जात असून माध्यमकर्मींवर देखील हल्ले होत आहे.कोणीही मोदींच्या विरोधात बालू नये!हाथरसच्या घटनेचे आरोपी दोन वर्षांत कारागृहा बाहेर आलेत!एकीकडे देशभक्तीची गोष्ट करायची धोरण मात्र दूसरेच राबवायचे.बुलडोजर चालवायचे त्यात माय-लेकीचा जीव ही घ्यायचा.मोदींनी इस्त्राईलचे बुलडोजर धोरण स्वीकारले असल्याची जळजळीत टिका याप्रसंगी त्यांनी केली.

मोदींच्या काळात जीवन स्वस्त व इतर सगळंच महाग झालं असल्याचे ते म्हणाले.या सरकारमध्ये संवेदनशीलताच नाही.अदानीला स्वत:च्या विमानात बसवून घेऊन जाणारे मोदी इतर ही देशात अदानीला उद्योगांचे कंत्राट मिळवण्यास दबावाची नीती अवलंबितात हे श्रीलंकेच्या संसेदेच्या पटलावरच उमटलं असल्याचे त्यांनी सांगितले.बांगलादेशात तर अदानीला कोळश्‍याचा खदानींचा कंत्राट मिळवून देण्यासाठी बँक गॅरेंटर हवा म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियांच्या अध्यक्षांना विशेष विमानाने ऐनवेळी बांगलादेशात बोलविण्यात आले!

देशात इतर ही एवढे पुंजीपती असताना मोदींचा अदानींवरच एवढा जीव का?असा प्रश्‍न विचारला असता ,मैत्री,असे ते म्हणाले कारण मोदी हे आधी त्यांच्या विमानात फिरत होते आता ते मोदींच्या विमानात फिरतात,असे खरमरीत उत्तर त्यांनी दिले.बोली लागत आहे,अदानीचा मूलगा तर बोली लागण्यापूर्वीच ‘ये हम ले रहे है‘असे उघडपणे सांगतो.रेल्वेचे डबे बनविण्यासाठीचा कंत्राट ही असाच त्यांच्या घश्‍यात दिला जात आहे.

पूर्वी देशात चितरंजन,बनारस,रायबरेली इत्यादी ठिकाणी रेल्वेचे डबे बनविण्याची क्षमता १२०० होती ती आता मोदींच्या सूचनेनुसार ६०० वर आणण्यात आली,आता ते डबे विदेशातून आयात केले जात आहे.आपल्या देशातील जनतेला रोजगार देणारा उद्योग बंद पाडायचा आणि विदेशातून त्याच वस्तूंची आयात करायची ही मोदींची नीती आहे.रेल्वेही खासगी करुन टाकणार आहे,याचमुळे आज रेल्वेत दीड लाख पदे खाली आहेत जी भरली जात नाहीत.रेल्वे कर्मचा-यांच्या कॉलनीत ज्या रेल्वेच्या शाळा आहेत त्या देखील मोदींनी विकायला काढल्या,असा आरोप याप्रसंगी त्यांनी केला.

अदानीसाठी मग काँग्रेसची सरकार असणा-या राजस्थान सरकारन का पायघड्या घातल्या?यावर बोलताना यात फरक आहे,हा करार करताना कोणताही गैरफायदा अदानीला पोहोचू देण्यात आला नाही.बाडमेर,जैसलमेरसारख्या भागात वीज उत्पादनाची संसाधने आधीपासूनच होती.त्या क्षेत्रात अदानी येऊ पाहत आहेत तर याला विरोध नाही करणार.मूळात आमचा विरोध अदानीला नसून देशातील संसाधनांची जी लृट सुरु आहे त्या लृटीला आमचा विरोध आहे.

काँग्रेस केंद्रात सत्तेवर आल्यास या सर्व बाबींचे समीक्षण केले जाईल आणि पुर्नराष्ट्रीयकरण करण्याचा देखील विचार केला जाऊ शकतो,असा सूचक इशारा देखील याप्रसंगी त्यांनी दिला.

सांप्रदायिक राजकारण करुन माेदी सत्तेवर आले असले तरी २०२४ मध्ये कोणत्याही किंमतीवर पुन्हा सत्तेवर येऊ शकणार नसल्याचे ते म्हणाले.

भाजपचा देशातील मतदार हा महागाई,बेरोजगारीसारख्या समस्यांपलीकडे फक्त ‘हिंदू मुस्लिम‘भावनेवर भाजपला मतदान करीत असतो,२०२४ मध्ये काँग्रेसची काय रणनीती असणार?यावर बोलताना,आम्ही देशाची जी लृट सुरु आहे,ते जनतेसमोर आणू,मी स्वत: ब्राम्हण आहे,धर्म आम्ही पण मानतो,ते श्रीरामाला मानतात पण त्यांच्या राज्यकारभारात मर्यादा नसल्याचा टोमणाही यायप्रसंगी त्यांनी मानला.

पत्र परिषदेत आमदार विकास ठाकरे,विजय वडेट्टीवार,नितीन राऊत,काँग्रेसचे सोशल मिडीयाचे प्रमुख विशाल मुत्तेमवार,उत्तर भारतीय शाखेचे प्रमुख अग्निहोत्री आदी उपस्थित होते.

 

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या